Tuesday, June 3, 2014

मराठी साहित्यविश्वाचं ट्रेंडमॅपिंग



भविष्यकाळ हा शक्यतांचा प्रदेश असतो. अस्तित्वातच नसलेल्या काळामध्ये मराठी साहित्यविश्वात काय नवे पाहायला मिळेल, हा कितीही अभ्यासपूर्ण असला तरी कल्पनाविलासच. अनेकानेक मल्टिनॅशनल कंपन्या, राष्ट्रांची नियोजन मंडळे ‘सिनारिओ बिल्डिंग’ किंवा ‘ट्रेंड्स मॅपिंग’ करतात ते त्या बदलांना तयार राहाण्यासाठी किंवा त्या बदलांसाठी तरतूद करण्यासाठी. मराठी साहित्यविश्वाचं ट्रेंडमॅपिंग करायचं ते कुणासाठी? एक कारण मला दिसतं ते म्हणजे आपली समकालीन संस्कृती नवनिर्मितीला पोषक नाही. काय झाले असता ती अधिक उमदी, सृजनशील होईल याचा विचार करण्यासाठी ही कल्पनाविलासाची संधी वापरता येईल. सद्यकालीन मराठी साहित्यविश्वाच्या दूरवस्थेकडे बघता पुढील पंचवीस वर्षांसाठी काही अपेक्षा तरी व्यक्त करता येतील. ‘काहीही बदलणार नाही’ हा टिपिकल मराठी निराशावाद टाळून काही शक्यता जोखता येतील.

साहित्यकृती ज्या वातावरणात जन्म घेते ते वातावरण पुढील पंचवीस वर्षांत कसे बदलेल? साहित्यकृती रसिकांपर्यंत ज्या माध्यमातून पोहोचते त्या प्रसारित होण्याच्या पद्धती बदलतील त्याचा परिणाम साहित्यविश्वावर होईल का? आणि आशय आणि घाटाच्या, म्हणजे साहित्यकृतीच्या रचनेवरच पुढच्या पंचवीस वर्षांत काही बदल घडून येतील का? अशा तीन भागांमध्ये या ‘बदलाच्या शक्यता’ आपण बघू शकतो.
समकालीन सांस्कृतिक आणि सामाजिक वातावरण दुय्यम आणि तिय्यम दर्जाच्या साहित्यिकांसाठी अतिशय उत्तम आणि लाभदायक आहे. परंतु सक्षम साहित्यनिर्मितीला पोषक हे वातावरण नाही. साहित्यविश्वात बोकाळलेला जातीयवाद, ‘पॉलिटिकली करेक्ट’ या बॅनरखाली डाव्या विचारांकडे झुकणारी दांभिक विचारसरणी, कथनी आणि करणीमध्ये योजनांचं अंतर ठेवण्याची वृत्ती, जातीय विचार केंद्रस्थानी ठेवून निर्माण होणाऱ्या संहिता आणि वाटली जाणारी बक्षिसे हे सारेच वातावरण छाडमाड साहित्यनिर्मितीच्या उपयोगाचे आहे.

मराठी साहित्यविश्वातला हा वाङ्मयीन मूल्यांवरील निष्ठेचा अभाव आणि दांभिकता पुढील पंचवीस वर्षांत कमी होईल असे प्रथमदर्शनी तरी वाटत नाही. पत्रकार कुळातील लेखक आणि समीक्षक होण्याच्या या काळात मराठी विश्वात मूलगामी परिवर्तनाची अपेक्षा पुढील पंचवीस वर्षांत ठेवता येईल का?

साहित्यकृतींच्या प्रसाराची माध्यमे बदलताना दिसत आहेत. ऑडिओबुक्स, बुकगंगा असा नवा प्रवाह हळूहळू रुजतो आहे. इंटरनेटच्या माध्यमातून भाषेचे उथळ चलनवलन निश्चित वाढेल. मात्र गंभीर/उत्तम लेखनाला आवश्यक, ‘चिंतन आणि खोलीचा अभाव’ याच प्रवाहाबरोबर वाढेल असे लक्षण आहे. फेसबुक चर्चा, कादंबऱ्या, शोधनिबंध बघता सरकणाऱ्या फालतू टाईमलाईनवरचे लेखन कदाचित भरपूर उगवून येईल.
दुसरीकडे कॉपीराईट शहाणे-टाईप कृतीतून नवी आर्थिक समीकरणेही उदयाला येतील. लेख समाविष्ट केल्यावर किंवा कादंबरी छापल्यावर लेखकांना ‘न मागता’ पैसे देण्याची अक्कल प्रकाशकांना पुढील पंचवीस वर्षांत आली तर ‘पावले’ असे म्हणावे लागेल. जर प्रथम दर्जाचे लेखन, विशेषतः कथनात्म सकस साहित्य येत्या पंचवीस वर्षांत वाढले तर ‘प्रकाशक-लेखक’ नात्यातील प्रकाशकीय दादागिरी काही प्रमाणात आटोक्यात येईल. दिवाळी अंक, पुरस्कार, प्राध्यापकीय नोकऱ्या, कॉर्पोरेट कंटाळ्यावर उपाय, राजकारण्यांकडून पैसे वा मान उधार घेऊन उपकार परतफेड करण्यासाठी आजकाल कथात्म अथवा समीक्षात्मक साहित्याचा वापर होतो. या समकालीन ‘चाटू’ संस्कृतीला उद्ध्वस्त करणारं लेखन पुढील पंचवीस वर्षांत जन्माला येईल काय?

प्रत्येक साहित्यिक आणि समीक्षक विविध कळपांच्या दगडाखाली हात असल्यामुळे ‘क्षीण विरोध’ करत फेसबुकी नोंदी करतात. साहित्यिकदृष्ट्या अत्यंत भ्रष्ट साहित्य संमेलने, अध्यक्षांच्या निवडीचं राजकारण, दुय्यम गुणवत्तेच्या अध्यक्षांची निवड यामध्ये पुढील पंचवीस वर्षांत बदल व्हायला हवा, मात्र या बदलाची सुरुवात होईल कुठून?

आशय किंवा घाटाचे प्रयोग हे कालसापेक्ष नाहीत. ते लेखक आणि कवीच्या ऊर्जासापेक्ष आहेत. म्हणजे काय? तर पंचवीस वर्षांचा काळ, त्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रोमोझोमल बदल- कंद मनुष्यपणा बदलत नाहीत. त्या बदलांमुळे न लिहिणारे समूह, व्यक्ती लिहिते होतात- मात्र आशयात आणि घाटात खरी क्रांती होते ती लेखकाच्या तपश्चर्येतून.

एक आशा अशी आहे की भारतात नव्यानं येणारा पैसा, ग्लोबल संधी यामुळे लिहित्या व्यक्तीला चरितार्थासाठीचा पैसा कमावण्यासाठी विविध साधने उपलब्ध होतील यातून कदाचित लेखकाचे स्वातंत्र्य वाढेल, मिंधेपणा कमी होईल.

सद्यकाळात धरठावाचा अभाव आणि पुनर्लेखनाच्या शिस्तीचा अभाव यामुळे कादंबरीसारखं दिसणारं परंतु कादंबरीच्या पातळीला न पोहोचलेलं लेखन बजबजलेलं आहे. पुढील पंचवीस वर्षांत काही भागातल्या समाजकारणाच्या बदलांमुळे मन लावून लिहिणे, गद्याचा सखोल विचार करून, त्यावर संस्करण करून ते प्रकाशित करणे यासाठी आवश्यक नैतिकतेचा आणि धीराचा जन्म पुढील पंचवीस वर्षांत कदाचित पहावयास मिळेल.

अशी एक आशा आहे की साहित्य अकादमी असो किंवा गावोगावचे छडमाड पुरस्कार, ते तुम्हाला लेखक बनवत नाहीत. तर समकालीन लेखक म्हणून मिळणारी पुरस्कारग्रस्त प्रसिद्धी ही मोठ्या मापाच्या चड्डीसारखी आपसूक घरंगळणारी वस्तू आहे हे कळल्यानंतर समकालीन बऱ्या लेखकांना भान येईल. पुरस्कार आणि कळप यांना फाट्यावर मारून लेखक म्हणून आपण एक निश्चित भूमी मिळवू शकतो हा खरा, अस्सल देशीवाद पुढील पंचवीस वर्षांत जन्माला यावा अशी अपेक्षा आहे. मराठी भाषेची भूमी सकस आहे परंतु इथं ‘सनदी शेतकरी’ ‘हजारातुनी एखादाही’ दिसत नाही हे दुर्दैव.

शब्दातील, भाषेतील, विचारातील ताकद- ते शब्द, ती भाषा ते विचार मांडणाऱ्या व्यक्तीच्या सच्चेपणावर, तिच्या मूल्यनिष्ठांवर, विसंगती टिपू शकणाऱ्या तिच्या बुद्धिमत्तेवर, माणूस म्हणून जाणू शकणाऱ्या तिच्या करुणेवर आणि तिने स्वीकारलेल्या लेखनमार्गावरील प्रवासातल्या अथक एकल्या श्रमांवर अवलंबून आहे.

समकालीन संस्कृतीतला साहित्यिक प्रभावहीन आहे. या परिस्थितीची तरफ उलटवायची तर आशयाच्या नवनवीन प्रयोगातून वाचनीय (रंजक नव्हे) साहित्याची निर्मिती ही एकमेव गोष्ट लेखकाला प्रभाव क्षेत्राच्या केंद्राकडे घेऊन जाईल. त्या प्रक्रियेची सुरुवात कळपाचा आपल्या आतल्या समाधानाला शून्य उपयोग होतो या मूलभूत भानातून होईल अशी आशा मला आहे.

शेवटचा मुद्दा असा की, पुढील पंचवीस वर्षांत ज्या सावल्यांच्या आधारानं मराठी साहित्यसंस्कृती डौलानं उभी राहिली ते वटवृक्ष पृथ्वीतलावर नसतीलही- नेमाडे यांचं राजकारण वजावूनही उरणारी लेखनावरची प्रचंड निष्ठा, हेतूची सुस्पष्टता, फॉर्मचं अत्यंत नेमस्त भान, श्याम मनोहरांचा ज्ञानमार्गी वज्रपंथ, प्रयोग करण्याची आणि मांडण्याची प्रचंड क्षमता आणि त्यासाठी आवश्यक तपश्चर्या, नामदेव ढसाळांच्या (राजकीय आणि सामाजिक घटिया तडजोडी वगळता) प्रचंड ताकदीचं कवितेच्या ऊर्जेचं बळ याचा वारसा पुढे नेईल असे लेखनकर्मी पुढील पंचवीस वर्षांत तयार होतील का? तसं होण्यासाठी या समकालीन सभ्यतेतल्या कोंडमाऱ्याचं आकलन आपल्याला करून घ्यावं लागेल, त्यावर उपाय शोधावे लागतील.

राजकारणाला हाताशी धरून नेमाडे यांनी त्यांच्या प्रातिभ बळावर त्यांच्यापुरते उपाय काढले, श्याम मनोहरांनी ‘बेबी युनिव्हर्स’चे प्रयोग करत तुसडेपणानं स्वतःचा मार्ग शोधला- मात्र पुढील पंचवीस वर्षांत प्रथम दर्जाच्या निर्मितीक्षमतेवर सतत दुय्यम आणि तिय्यम दर्जाच्या कळपांचा विजय याचं गणित भेदून आपण पुढे जाऊ शकणार आहोत का?

यातल्या प्रवासातच नव्या वाचकाशी अधिक सत्य नातं निर्माण होण्याची बीजं रुजत जातील. सुरुवातीचे मर्ढेकर, नामदेव ढसाळ, मनोहर ओक यासारख्या कवींनी केलेला भाषेचा, तत्त्वज्ञानाचा लवचिक वापर, नव्या रुपकांची निर्मिती समकालीन कवितेत दिसत नाही. अरुण कोलटकरांसारख्या कवितांसाठी आवश्यक एकांतऊर्जा पुढील पंचवीस वर्षांत कवींकडे एकवटेल काय? या खरा प्रश्न आहे.

लेखनात, कथात्म साहित्यात समाज बदलण्याची ताकद असते मात्र त्याची पूर्वअट म्हणजे साहित्यिकांची डोकी आणि हृदयं जागच्याजागी लागतात.

उत्तर-भांडवलशाहीत मास (लोंढा) याऐवजी ट्राईब (छोटा एकजिनसी बुद्धिमान समूह) सर्व मार्केटिंग संकल्पनांच्या केंद्रस्थानी येऊ लागला आहे. ब्रुस नुसब्राऊमे ‘क्रिएटिव्ह इंटेलिजन्स’ किंवा टॉम केलीचे ‘क्रिएटिव्ह कॉन्फिडन्स’ ही दोन पुस्तके व्यावसायिक क्षेत्रातील सृजनशीलतेची महत्ता अधोरेखित करतात.

या वातावरणात पुढील पंचवीस वर्षांत मराठीतील लिहिती, विचार करती, वाचती व्यक्ती क्षुद्र राजकारणापलीकडे छलांग मारू शकली तर मराठी साहित्यात नवीन निर्मला पुतुल, नवा मार्खेज, नवा मुराकामी, नवा चक्रधर, नवा मर्ढेकर- नवा नवा साहित्यिक, पहिल्या धारेचा आणि ओरिजिनल जन्माला नक्कीच येऊ शकेल! (जन्माला आला असेल तर संस्कृतीच्या केंद्रस्थानी येऊन प्रभावही टाकू शकेल हे निश्चित!)
---

 (प्रथम प्रसिद्धी चित्रलेखा साप्ताहिक)

सोरेंटिनोचा ‘द ग्रँड ब्युटी’





जानेवारी महिन्यात पुण्यात पिफ महोत्सव आयोजित करण्यात आला होता. तिथं सोरेंटिनो या इटालियन दिग्दर्शकाचा अप्रतिम सिनेमा ‘द ग्रँड ब्युटी’-‘ला ग्रांद बेलझ्झा’ बघायला मिळाला. सुबत्तेच्या ओझ्याखाली क्षीण होत जाणाऱ्या सर्जनशील आवाजाचा, सौंदर्याचा, निर्मितीक्षमतेच्या अभावाचा शोध आणि विश्लेषण सोरेंटिनोनं या चित्रपटाद्वारे केलं आहे.

अंतोनिओनि आणि फेलिनी या दोन दिग्गज दिग्दर्शकांच्या कलाकृतीसोबत ‘द ग्रँड ब्युटी’ची व्हिज्युअल भाषा संवाद साधते. कित्येक महत्त्वाच्या कलाकृतींमधल्या (ला डोल्शे विट्टा, ला नोट्टे) प्रसंगांची पताका स्थानं मिरवत ‘द ग्रँड ब्युटी’ हा सिनेमा उलगडतो. ‘एट अँड हाफ’ या फेलिनीच्या सिनेमाची सुरुवात अत्यंत प्रभावात्मक आणि प्रतिकात्मक घुसमटीनं होते. ‘द ग्रँड ब्युटी’ आपल्याला अतिश्रीमंत, अति सुबत्तेत दंग असलेल्या रोमन पार्टीलाइफमध्ये खेचतो. पूर्वसुरींच्या कलाकृती सोबत सोरेंटिनोची फिल्म अत्यंत इंटेन्स पद्धतीनं संवाद साधते आणि ती बघणाऱ्या डोळ्यांना अधिक खोलात उडी मारायचं आवाहन करते.

जेप गॅम्बार्डेला- रोममधला लेखक- हाय सोसायटी पत्रकार.. त्यानं पहिली कादंबरी लिहूनही चाळीस वर्षं उलटलीएत. जेपच्या पासष्टाव्या वाढदिवसाच्या प्रचंड, डिकेडन्ट पार्टीनं ‘द ग्रँड ब्युटी’ची सुरुवात होते.
सुंदर शरीरं, फॅशन्स, बेभान म्युझिक, मनोरंजनाचं उथळ अमेरिकन नव्हे, तर युरोपियन वातावरण. अमेरिकन पार्टी म्हणजे तरुण, सेक्स-ड्रिव्हन, उथळ आणि कॅलस समूह तर युरोपियन हाय सोसायटी पार्टी ही उत्तरमध्यमवयीन, तारुण्याच्या शोधात पण तारुण्यापलीकडे गेलेल्या परंपरागत श्रीमंतांची पार्टी. या पार्टीत बेभान होऊ इच्छिणारे एकएकटे जीव आणि पार्टी संपल्यावर पहिल्यांदा भानावर येणारी जेपची सौंदर्यविहीन एडिटर या अत्यंत वेगवान पार्टी प्रसंगातून सोरेंटिनोचा ‘सौंदर्यशोध’ सुरू होतो.

रोममध्ये दोन राजधान्या एकमेकांसोबत नांदतात. पहिली कॅथलिक चर्चमुळं जगभरच्या ख्रिश्चन धर्मियांच्या धर्मसत्तेचं केंद्र असलेलं रोम- दुसरीकडे मिलानसारख्या शहराजवळचं, डिझायनर फॅशनचं केंद्रस्थान. युरोपच्या धर्मसत्ता आणि श्रीमंत वर्गाची ‘कंझम्प्शन सत्ता’ रोममध्ये एकवटलीए- त्या शहरात, बाल्कनीतून सिटाडेल दिसतं अशा प्रचंड घरात जेप राहातो.

इथल्या जगण्यावर जेपनं मांड घातलीए- मात्र ते करताना जीवन त्याच्या बोटाच्या फटीतून निसटलंय. बाकी कुणाला नसलं तरी जेपला त्या जीवनाच्या, व्हायब्रंट अस्तित्वाच्या अभावाचं भान आहे.

रोममध्ये विविध नवश्रीमंतांचे थर येत आहेत.. आणि ही सुबत्तेची झुकझुक गाडी जागच्या जागीच फेऱ्या घालतीए.. ‘इथे आले, इथून पुढे कुठं?’ हा प्रश्नच त्यांना सोडवता येत नाहीए.. या साडेतीन फूट खोल स्विमिंगपूलमध्ये सगळेच तरंगतायत पण खोल सूर कोणालाच मारता येत नाहीए..या जीवनाची संगती लावत, काहीसा अलिप्त, पासष्टाव्या वाढदिवशी थोडा अस्वस्थ झालेला तीव्र बुद्धिमान जेप ‘ग्रँड ब्युटी’चा शोध घेतो.

रोममधल्या विविध ऐतिहासिक सौंदर्यपूर्ण वास्तू, चित्रकलेच्या क्षेत्रातले (उथळ) प्रयोग, हाय फॅशन, त्यासोबत येणारं हाय लाईफ- सोरेंटिनो या सुखानं भरलेल्या आयुष्यातल्या निर्मितीच्या अभावाचा कंद सोलतो. (लहान मुलीला खेळू न देता तिला चित्रात प्रयोग करायला लावणारा कलात्मक पेडोफेलिया इथंच भेटतो.)

या अति श्रीमंतीचं व्याकरण जेपनं आत्मसात केलंय. फ्यूनरलचं व्याकरण तो गणितमानी पायऱ्या-पायऱ्यांनी डिकोड करून मैत्रिणीला सांगू शकतो. फ्यूनरल कळणाऱ्या जेपला- मैत्रिणीच्या मृत्यूनंतर ‘मृत्यू’ समजतो.
प्रेम, सेक्स, सौंदर्य, त्यामध्ये दंग होणं- सारं काही जेपच्या आयुष्यात आहे. मात्र सुबत्तेत सौंदर्याचं अवतरण होत नाही. मनावरची भुतं एकेकाळी यशस्वीपणे उतरवणारा कार्डिनल बेलुचीदेखील जेपच्या मनावरचं हे साचलेपणाचं भूत दूर करू शकत नाही. मात्र ‘पराकाष्ठा’ म्हणजे काय? ते समजलेली संतत्त्वाच्या पायऱ्या चढणारी नन- जेपला सौंदर्यरहस्याचा दरवाजा किलकिला करून दाखवते.

जेपच्या बाल्कनीत या ननच्या एका हळुवार हाकेनं जेव्हा सारस पक्षी अवतरतात आणि तिच्या हळुवार फुंकरीनं ते उडून जातात या चमत्कार दर्शनानं ‘द ग्रँड ब्युटी’चं सहजत्व आणि त्यातली जगणं जाणण्याची किमया जेपला क्षणकाल दिसून जाते.

या साऱ्या व्यक्तींचा ग्रँड परफॉर्मन्स ज्या स्टेजवर चालू आहे- त्या मोकळ्या जागेचं नाव आहे रोम. युगायुगांच्या सांस्कृतिक इतिहासाचे थर या शहरावर आहेत... ‘रोमानियत’- या रोमची घडी जेपला उलगडलीए- तसंच इथला घुसमटता, वांझ एकटेपणा, प्रेमाचा अभावही त्याला समजलाय.

युरोपच्या अति वैभवात दंग झालेली पार्टी जेपला बेचव वाटते. पण जे पार्टीत आहेत त्यांना पश्चात्तापाचा स्पर्शही झालेला नाही. या साऱ्या कंझप्शनग्रस्त जगाला अधोविश्वातून टेकू देणारा डॉन जेपचा शेजारी आहे आणि तो आपला शेजारी आहे हे त्याला अटक होईस्तोवर जेपला कळत नाही- हे सोरेंटिनोचं दिग्दर्शक म्हणून जाणवणारं रचनेचं कौशल्य आहे.

अस्तित्ववादाच्या पकडीतून सुटत एका पोस्टमॉडर्न चमत्काराला सोरेटिनोच्या ‘द ग्रँड ब्युटी’ कवेत घेतो. जेप गँबार्डेलामार्फत, १४२ मिनिटांत युरपच्या, डिकेडन्ट, दुखऱ्या, रिकाम्या ह-दयावर सोरेंटिनो कॅमेरा रोखतो आणि पार्टीनंतरच्या पहाटे- एक चमत्काराची शक्यता जेपच्या मनात जागी करतो.न लिहित्या लेखकाला, त्याच्या न लिहिण्यात केंद्रस्थानी ठेवणारी ही कलाकृती- आणि अति वैभवानं संवेदनाशून्य झालेलं रोम हे त्या लेखकाच्या मनाचं नेपथ्य- या जागेत ‘द ग्रँड ब्युटी’ आकाराला येते- आणि आयुष्य उलगडणाऱ्या डोळ्यांना खिळवून ठेवते.

Saturday, January 25, 2014

खाष्ट विदुषी आणि अलिप्त परिपूर्ती


दुर्गा भागवत आणि इरावती कर्वे या दोन लेखिकांची तुलना करण्यापूर्वी मराठी संस्कृती समीक्षेची संदर्भचौकट समजून घ्यावी लागेल. मराठीतील संस्कृती समीक्षेचा प्रवास राजवाडे, राजारामशास्त्री भागवत, फुले, विठ्ठल रामजी शिंदे, केतकर असा बघता येतो. भारतीय समाज आणि संस्कृती समीक्षेचा प्रवास डी. डी. कोसंबी, राहुल सांकृत्यायन, आनंद कुमारस्वामी, धरमपाल, लोहिया नावांखेरीज करता येत नाही. राजवाडे, फुले, भागवत यांची इतिहासाकडे बघण्याची दृष्टी सामाजिक आहे. विठ्ठल रामजी शिंदे, डाॅ. आंबेडकर, केतकर यांची जातिव्यवस्थेची समीक्षा ही सांस्कृतिक इतिहास जमेस धरून करण्यात आली आहे.

समकालीन लेखकांमध्ये देशीवादाची मांडणी करणारे डाॅ. भालचंद्र नेमाडे,तुकारामदर्शनकार  डाॅ. सदानंद मोरे तसेच विलास सारंग व दिलीप चित्रे यांची वाड्मयीन समीक्षा ही सांस्कृतिक समीक्षा म्हणूनच तपासावी लागेल.

पत्रकार नसताना वैचारिक लेखन करणा-या सामाजिक लेखकांच्या यादीत ‘गावगाडा’ लिहिणारे अत्रे, ‘स्रीपुरुष तुलना’ लिहिणा-या ताराबाई शिंदे यांचे लेखन करता येईल. या व्यापक संदर्भचौकटीच्या अंतर्गत  दुर्गा भागवत आणि इरावती कर्वे यांचे लेखन बघून त्यांची तुलना करावी लागेल.

या दोन्ही लेखिकांच्या यशात आणि कौतुकात त्यांच्या बौद्धिक कष्टांचा, स्पष्टवक्तेपणाचा, स्वच्छ अंत:करणाचा जास्त वाटा आहे तसाच त्यांच्या उच्चवर्णीय स्री असण्याचा आणि प्रिव्हिलेज्ड कुटुंबाची पार्श्वभूमी लाभण्याचा वाटाही बराच मोठा आहे.

‘जेंडर’ आणि ‘जात’ या दोनही गोष्टी महाराष्ट्रात (आणि भारतात) वैचारिक योगदानाचा संदभ तपासताना ध्यानात ठेवाव्याच लागतात. या दोन्हीपेक्षा अधिक महत्वाची समाजशास्त्रीय अभ्यासकांची जोडगोळी म्हणून खरेतर विठ्ठल रामजी शिंदे आणि श्रीधर व्यंकटेश केतकर यांची तुलना आपल्याला करावी लागेल. शिंदे यांचा बहुजनवादी दृष्टिकोण आणि डिप्रेस्ड क्लास मिशनचे काम, समाजशास्त्रीय लेखन आणि केतकरांचा ‘ज्ञानकोशा'सारखा बृहद्प्रकल्प, कादंब-यामधील सुधारणावादी दृष्टिकोन आणि चित्पावनकेंद्री भाषिक दृष्टी यांची तुलना संस्कृती समीक्षेत खरेतर अधिक महत्वाची ठरेल. मात्र या लेखाचा विषय त्यांची तुलना हा नाही. राजवाडे आणि राजारामशास्त्री भागवत, स्री सुधारणांच्या संदर्भात फुले आणि आगरकर या तीव्र बौध्दिक भेदांवर आधारित जोड्यापेक्षा दुर्गा भागवत आणि इरावती कर्वे यांच्यात साम्यस्थळे अधिक आहेत.

मराठी संस्कृतीचा विश्लेषक अभ्यास हा दोघीच्याही अभ्यासात समान दुवा आहे. मराठीत लिहित्या- वाचत्या-विचारकर्त्या मनाला या दोघींची स्टेशनं लागतात, ती मलाही लागली. मी समाजशास्त्र शिकण्याचा निर्णय दुर्गाबाईबरोबर झालेल्या एका संवादानंतर घेतला. किनशिप सिस्टिम्सचा अभ्यास करताना इरावती कर्व्याचं लेखन संदर्भासाठी धुंडाळलं. तरी आता इतक्या वर्षानंतर या दोघींचं योगदान तपासताना त्याच्या आवाक्याच्या मर्यादाही ध्यानी येतात. ‘साधने’ तले जात-पात न मानणारे गांधीवादी ब्राह्मण आणि मौजेची बौद्धिक स्नॉबरी जपणारी पंरपरा उच्चवर्णीय या दोन्ही गटात या लेखिका फिट् बसल्या. आणि त्यांचं लेखन इंटरेस्टिंग आणि सुलभ असल्यामुळे विठ्ठल रामजी शिंदे किंवा केतकरांपेक्षा अर्थातच त्या आम्हाला अधिक जवळच्या वाटल्या, हे नमूद करायलाच हवं. या दोघीच्या लेखनाला ब्राह्मणी सदर्भचौकट आहे. ती ध्यानात ठेवून या विचारतुलेकडे बघावे लागेल.


संस्कृती समीक्षा (Cultural Studies या अर्थाने) हा शब्द वापरताना काही विशिष्ट ज्ञानशास्त्रीय साधनांचा आणि पंरपंराचा वापर आणि त्यांना वापरून केलेली संस्कृतीची चिकित्सा अभिप्रेत आहे. म्हणून हे बिरुद सर्व प्रकारच्या वाड्.मयीन समीक्षेला किंवा पत्रकारिता, प्रबोधन या हेतूने केलेल्या सर्व लेखनाला लागू पडत नाही.


इरावती कर्वे (जन्म 1905- मृत्यू 1970) आणि दुर्गा भागवत (जन्म 1910- मूत्यू 2002) या दोघी  समांतर लेखन करणा-या समकालीन लेखिका. त्या दोघींचे अभ्यासविषयही जवळपास सारखे. त्यामुळे त्याच्यात मनोमन फारसे चांगले गणित नसण्याचे मला नवल नाही.

दुर्गाबाईनी त्याच्या स्वभावानुसार ‘आठवले तसे’ मध्ये एक पूर्ण प्रकरण लिहून इरावतीबाईवर हल्ला चढवला आहे. त्या कशा स्वार्थी आणि करिअरिस्ट होत्या हे सांगताना इरावतींलर दुस-याचे श्रेय लाटण्याचा आणि अभ्यासात मूलभूत चुका करण्याचा आरोपही त्यांनी केला आहे. इरावतींना ज्ञानापेक्षा ज्ञानमार्गाने मिळणा-या सत्तेची अभिलाषा आधिक होती असे दुर्गाबाईंचे म्हणणे आहे. दुर्गाबाईंच्या मनातील या संतापाचे, अढीचे दर्शन त्या लेखात होते. इरावती मात्र अशा बाबतीत व्यवहारात नेटक्या आणी तोल ढळू न देणा-या असल्यामुळे दुर्गाबाईंबद्दल त्यानी काही उलटसुलट लिहिलेले नाही.दुर्गाबाईंचा स्वभाव वादप्रवण आणि त्यांना स्वतःच्या नैतिकतेचा प्रचंड (दुर) अभिमान असल्यामुळे त्याच्या सेल्फरायचसपणाच्या तलवारीखाली सगळेजण येतात. नेमाडे, आंबेडकर, गांधी, बुद्ध-कुणीच त्यातून सुटू शकले नाही. इरावतीतर त्यांच्या स्पर्धेत होत्या त्यांची सुटका होण दुरापास्तच होतं.  दुर्गाबाईच्या एकूण सर्व  विचारप्रकियेत त्यांच्या अतिनैतिकतेच्या  हट्टापायी आलेले अनेक चमत्कारिक विरोधाभास आहेत. त्या तुलनेत इरावती कर्व्याचं व्यक्तिमत्व समतोल अलिप्त, शिष्ट आणि टीकेपेक्षा स्वतःच्या कामात आणि संसारात व्यग्र असं दिसतं.

दुर्गाबाईनी आपल्या स्वतःच्या ‘ स्पेशल केस” असण्याची स्पष्ट चिकित्सा केलेली नाही. वडिलांनी आर्थिक तरतूद करून ठेवल्यामुळे त्यांना नोकरी करावी लागली नाही. आणि कोणत्याही आर्थिक विवंचनाही पाठीमागे लागल्या नाहीत. संसार, सेक्स आणि नोकरी या तीन गोष्टी अनेक स्री- पुरुषांना नमवतात. त्यातल्या संसार दुर्गाबाईनी मांडला नाही. आणि विषप्रयोगातून सावरल्यानंतर सेक्सविषयक त्यांच्या भूमिकेशी त्या एकनिष्ठ राहिल्या. त्यामुळे त्याच्या लेखनात सेक्सचा उल्लेख आणि पडसाद आढळले तरी त्या इच्छेनं त्यांना कधी नात्यात पडतं घ्यावं लागलेलं दिसत नाही.

नोकरी किवा अर्थाजनाची विवंचना नसल्यामुळे श्रेणीरचनेत सोसावे लागणारे अपमान त्याच्या वाट्यात आले नाहीत आणि संसारात कराव्या लागणा-या तडजोडीही त्यांच्या वाट्याला आल्या नाहीत. मात्र या प्रचंड ‘प्रिव्हिलेज्ड स्पेस’ मध्ये त्यांनी त्यांमानानं मर्यादित काम केलं. विचारस्वातंत्र्यासाठी त्यांनी आपलं मानसिक स्वास्थ्य पणाला लावलं होत. मात्र मूलभूत आर्थिक सुरक्षा त्यांना त्याही परिस्थितीत होती ही वस्तुस्थिती डोळयाआड करता येणार नाही. ते सारं ससंदर्भच स्वीकारावं लागतं.

इरावती कर्व्याचा प्रवासही प्रिव्हिलेज्ड आहे परंतु निराळा. आई- वडील ब्रह्मदेशात असल्यामुळे त्या वाढत्या रॅंगलर पराजप्यांच्या घरात. बी. ए. ला तत्वज्ञान विषयात सर्वप्रथम आल्या होत्या. फर्ग्युसनमधली मानाची दक्षिणा फेलोशिप त्यांना मिळाली. त्यानंतर त्यांचा दिनकर कर्व्याशी प्रेमविवाह झाला. लग्नानंतर इरावतीबाईंनी मानवशास्रात एम. ए. केलं आणि घुर्ये याच्या मार्गदर्शनाखाली प्रबंध सादर केला.

त्यानतर नव-यासोबत पूर्व जर्मनीत पीएच. डी करण्यासाठी त्या रवाना झाल्या. परत भारतात आल्यावर जाताना शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करणं त्यांना क्रमप्राप्त होत. वयाच्या २६ व्या वर्षी कर्वे स्रीशिक्षण संस्थेत रजिस्ट्रार म्हणून त्या जाॅईन झाल्या. ते काम त्याच्या आवडीचं नव्हतं तरीही ते त्यांनी स्वीकारलं. भारतात परतल्यानंतर ते वयाच्या ३८व्या वर्षापर्यंत म्हणजे जवळ जवळ बारा वर्षं इरावतीबाई आपली अॅकॅडमिक ओळख शोधत होत्या. दरम्यान त्यांनी (अत्यंत कटु घडामोडीनंतर) कर्वे स्रीशिक्षण संस्थेतील पदाचा राजीनामा दिला आणि डेक्कन कॉलेजमध्ये त्याची प्रोफेसर म्हणून नेमणूक झाली. याच दरम्यान त्यांच्या तीन मुलाचा जन्म झाला आहे.

इरावतीबाईचा पहिला लेख ‘अभिरुची’ त १९४३ साली प्रकाशित झाला. त्या वेळी गौरी, त्याची तिसरी मुलगी एक वर्षाची होती. १९४३-१९७० म्हणजे त्याच्या मूत्यूपर्यत २७ वर्ष इरावती लेखन-संशोधन  केलं आहे. या संशोधनाचा फोकस अर्थात त्या डेक्कन कॉलेजमध्ये शिकवत असल्यामुळे फिजिकल अँथ्रोपाँलॉजी हा आहे. डेक्कन कॉलेजमधील नेमणुकिनंतरचा इरावतीबाईंचा प्रवास अॅकॅडमिक आहे. त्यांना नंतर एक वर्ष लंडन विद्यापीठात तर एक अमेरिकेतील बर्कली विद्यापीठात व्याखती म्हणून आमंत्रित  करण्यात आलं होतं. बर्कलीतल्या इरावती कर्व्याच्या वास्तवानंतर त्यांच्या लेखनात एक निराळा बदल जाणवतो. बर्कलीच्या वाटेवर इरावतीबाईना हृदयविकाराचा त्रास झाला आणि त्यानंतर त्या अनुभवाची छाया त्यांच्या मनावर कायम राहिली. त्याची घनिष्ट मैत्रिण सुलोचना देशमुख यांनी ‘गंगाजल’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत त्यासंबंधी लिहीलं आहे.

इरावती कर्व्यांच्या लेखन प्रवासातला मह्त्वाचा टप्पा म्हणजे १९६७ साली त्यांनी लिहिलेलं ‘युगान्त’ त्याला साहित्य अकादमी पुरस्कारही मिळाला. (जो १९६२मध्ये प्रकाशित झालेल्या व्यासपर्वला नाही.) इरावतींच्या संस्कृती-केंद्री लेखनाला मिळालेली ती दाद होती. यानंतर तीन वर्षातच इरावतींचा मृत्यू झाला. इरावतीबाईंबद्दल इतकं सविस्तर लिहिण्याच कारण म्हणजे त्यांचं लेखनही याच जीवनानुभवावर आधारलेलं आहे, ‘परिपूर्ती’, ‘भोवरा’, ‘गंगाजल’ मध्ये भेटणा-या इरावतीबाईंना मुलं, करिअर, नोकरी, कुटुंबाचे सारे प्रश्न सामोरे येतात आणि सामान्य माणसाला विशेषत: स्रीला  हेवा वाटावा असा संसार करतानाही इरावतीबाईंचा तटस्थपणा त्यांच्या भाषेतून जाणवत राहतो. या अलिप्तपणानं त्यांचं वैयक्तिक लेखन वेढलं गेलेलं आहे. ही ‘न गुतण्याची स्टॉईक किमया’ त्यांना साधलीए. वैचारिकदृष्ट्या त्यांच्यावर प्रभाव आहे तो उदारमतवादाचा आणि कुरुंदकर काहीही म्हणोत देवदयेनं इरावतीबाई लिबरल, नेमस्त आहेत पण समाजवादी नाहीत. समाजवादी ढोंगाचा अभाव ही त्यांच्या लेखनाची मोलाची बाजू आहे. त्या राजकीय भूमिकेत गुंतलेल्या नाहीत. मात्र अत्यंत व्यावहारीक, प्रॅग्मॅटिक आणि वस्तुस्थितीला सामोरं जाणारी अशी त्यांची मतं आहेत.
हिंदू कायद्याच्या संदर्भात त्यांनी आपल्या साक्षीत जी मतं मांडली ती अभ्यासण्याजोगी आहेत,कर्वे कुटुंबातील र. धों. कर्व्यांचा प्रभाव हे कारणही असेलही परंतु बहुपत्नीत्व विवाहांतर्गत स्रीचे हक्क, लग्न झालेल्या पुरुषाच्या प्रेमाच्या तडाख्यात सापडल्यामुळे  दुस-या बाईचे उद्ध्वस्त होणे या संदर्भात इरावतीबाई केवळ लिबरल मतं मांडत नाहीत . तर भारतीय संस्कृती इतिहासाच्या संदर्भात स्रीला मिळणारा न्याय म्हणजे काय? ते तपासतात.


दुर्गाबाईंचा प्रवास निराळा आहे. क्षमता आणि बुद्धिमत्ता असूनही डावललं गेल्याचा राग आणि संताप मनात आहे. अत्यंत तरुण वयात गोंडाचा अभ्यास करताना जंगलातलं विषारी सुरण खाल्यामुळं त्यांची तब्येत पूर्ण बिघडली. त्या आजारपणातून त्या उभ्या राहिल्या तीच त्यांच्या मन:शक्तीची कमाल म्हणावी लागेल. घुर्ये यांनी केलेल्या अन्यायामुळे बाईंची पीएच. डी. अभ्यास करूनही पूर्ण झाली नाही. राम गुहांनी लिहिलेले वेरिएर एल्विनचे चरित्र वाचताना घुर्येदर्शनही झाले. घुर्यांच्या विसंगती त्यामुळे नजरेला आल्या.

इरावती कालांतराने तरी अॅकॅडमिक धारेला लागल्या तशा दुर्गाबाई त्या प्रवाहातून बाहेर फेकल्या गेल्या. त्यानंतरचे त्यांचे अभ्यासक्षेत्र संहितांचा एन्थ्रोग्रॅफिक अभ्यास असे राहिलेले दिसते.
प्रतिभा रानडे यांनी ‘एैसपैस गप्पा’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत दुर्गाबाईंचा प्रवास मांडलाय. १९३८साली मध्यप्रदेशात, अतिदुर्गम भागात संशोधनासाठी फिरताना त्यांना विषबाधा झाली.त्या वेळी दुर्गाबाई होत्या २८ वर्षाच्या. यापूर्वीचं दुर्गाबाईचं लेखन Early Buddhist Jurisprudence म्हणजे बुद्धकाळातील विनयपिटकात वर्णिलेल्या न्याय संकल्पनेचा अभ्यास या विषयावर झालेलं होत. मूळ बौद्ध ग्रंथ वाचता यावेत म्हणून त्या पाली आणि अर्धमागधी शिकल्या होत्या. इरावतींच्या लेखनात पाश्च्यात तत्वज्ञानाचा प्रभाव जाणवतो तर दुर्गाबाईंच्या विचारांचा मूळ कंद बौद्ध दर्शनात सापडतो.
दरम्यान दुर्गाबाईंना साने गुरुजींनी लिहिते केले. दुर्गाबाईंची भाषेबाबतची संवेदनशीलता अफाट आहे. आणि त्यांची भाषिक जाणीव अतिप्रगल्भ आहे. शैली त्यांनी अभ्यासानं कमावली. इरावतीचं लेखन आधेक उस्फूर्त तर दुर्गाबाईचं मेटिक्युलस असा दोघींच्या शैलीतला फरक.१९५६मध्ये ‘ऋतुचक्र’ १९६२मध्ये ‘व्यासपर्व’ दरम्यान दुर्गाबाईंचा हात सतत लिहिता होता.१९७०मध्ये’पैस’ प्रकाशित झाले. या दरम्यान दुर्गाबाईंनी विविध समाजशास्त्रीय कमिट्यांवर कामे केली. लेखन,भाषांतरं, वाचन, चिंतन केले. मात्र त्यांच्या कर्तृत्वाचा ठसा उमटण्याचा काळ म्हणजे ७०चं दशक.
वादप्रवणता आणि पॉलीटीकल करेक्टनेसपेक्षा स्वतःच्या नैतिक चौकटीत काय बसतं याचा विचार करून स्पष्ट बोलणं यामुळे दुर्गाबाई या दशकात सतत गाजत राहिल्या.वेश्याव्यवसायाची आवश्यकता मांडताना त्यांनी जी विधानं केलीएत ती वाचताना अंगावर काटा येतो. राजा ढाले यांनी बाईंच्या विरोधात ‘साधने’ त लेख लिहून त्यांचे अक्षरशः वाभाडे काढले आहेत. लिटील मॅगेझिनवाल्यांच्या म्हणजे भाऊ पाध्ये, अशोक शहाणे, अरुण कोलटकर यांच्या बाई जवळ होत्या. परंतु लिटिल मॅगेझिनवाल्याची मार्क्सवादी, डावी आणि दलित जाणिवांणी समाज व्यवस्थेला शह देऊ पाहणारी विचारसरणी दुर्गाबाईंची नव्हती. त्या एका गांधीवादी मुशीतून घडल्या गेल्या. त्या मुशीत एकदा तत्व मानलं की त्या तत्वासाठी लढा देणं अभिप्रेत होतं मात्र त्या तत्वाची ‘पॉलिटकली करेक्टनेस’च्या दगडावर परीक्षा करण्यापेक्षा दुर्गाबाई नैतिकतेच्या भूमिकेवर त्याची चिकित्सा करत होत्या.

त्यामुळेच भाऊ पाध्यांना समर्थनही देताना हुसेनवर टीका करण्यास त्या कचरल्या नाहीत. हुसेन याचा रामायणाचा अभ्यास धड नाही आणि त्याची चित्रं संदर्भहीन म्हणून अश्लील आहेत हे मत मांडताना त्यांच्यातला अभ्यासक मागेपुढे पाहत नाही.हुसेनला पाठिंबा देणा-या आणि रश्दीच्या ‘सॅटॅनिक व्हर्सेस’ वर टीका करणा-या डाव्या लिबरल्सना दुर्गाबाई ठोकून काढतात. अनेक समाजवादी जेव्हा दुर्गाबाईचं कौतुक करतात तेव्हा कितीदा माझ्या मनात येतं की,अरे तुमच्या या आयडिऑलीजिकल दंभाच्या पूर्ण विरोधात ही बाई उभी होती हे तुम्हांला समजतंय. या थेटपणाचे,निर्भीडपणाचे आणि निस्पृह्तेचे सर्व मार्क दुर्गाबाईंच्या पारड्यात जातात.यानंतर त्यांच्या जीवनपटात घडतो तो आणिबाणी आणि कराडच्या साहित्य संमेलनाचा एपिसोड.

दुर्गाबाईंवर त्यांच्या अनेक मतांबद्दल टीका करताना, त्यांच्या निर्णयांची समीक्षा करताना तरीही याबद्दल अपार आदर वाटत राहतो. तो त्यांच्या कराडच्या संमेलनातल्या आणिबाणी निषेधामुळं. दुर्गाबाईंना आयुष्यानं दिलेल्या ‘प्रिव्हिलेज्ड स्पेस’ चा अत्यंत उदात्त निर्णयासाठी त्यांनी या प्रसंगात उपयोग केला.विचारस्वातंत्र्याच्या लढ्यात या कृतीला तोड नाही. दुर्गाबाईंच्या नैतिकतेच्या बळाला जयप्रकाशांच्या आदर्शवादाबद्दल अतिशय आदर वाटत होता हे त्यांनी स्वतःच लिहिलेलं आहे.
मात्र नंतर एक नागरिक म्हणून मंत मांडताना झोपडपट्टी वाढण्याबद्दल ‘जंगल फोफावतंय’ सारखं भयंकर लेखन नंतर दुर्गाबाईंनी केलं आहे.‘सामना’ तलं स्तंभलेखन त्यांनी का केलं? हा प्रश्न पडतो. किंवा ‘आठवले तसे’ सारखं पुस्तक समाजशास्त्रीय दस्तावेज म्हणून कसं बघायचं याबद्दल मनात संदेह निर्माण होतो. बाईंनी यशवंतरावांसारख्या नेत्याला एका कॉमेंटच्या फटक्यानं उडवून लावणं हेदेखील न पटणारं. दुर्गाबाई या सा-या विरोधाभासांचं मिश्रण आहेत. प्रतिभा रानडे यांचं ‘ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी’ हे पुस्तक मला आवडत नाही कारण त्यांनी फार मायेनं दुर्गाबाईंच्या विसंगती एडिट केल्यायत हे पदोपदी कळत रहातं. दुर्गाबाई हे अनेक कॉन्ट्रॅडिक्शन्शनी मिळून तयार झालेलं मिश्रण होतं. त्यामुळेच बदलत्या काळात, शेवटच्या टप्यात त्या रिलेव्हन्ट राहिल्या नाहोत. इरावती आणि दुर्गाबाईंची तुलना करताना दुर्गाबाईंच्या ‘देशी’ विचारप्रणालीतून सकस झालेल्या स्वर आणि इरावतीबाईचा पाश्च्यात लिबरल विचारधारेवर पोसलेला नेमस्त पिंड सतत जाणवत राहतो. त्या दोघींच्या फरकाचं मूळ त्यांच्या या भिन्न बौद्धिक परंपरांमध्ये आहे.

कर्व्यांच्या घरात सून म्हणून राहणं सोपं नव्हतं तसंच गौरीची आई होणं हीपण काही साधी भूमिका नव्हती. आपल्या आयुष्याबद्दल लिहिताना इरावती बाई स्वतःच्या निर्णयांची समीक्षा करतात. ही Self reflexivity हा त्याच्यां विचारप्रक्रियेचा भाग आहे.

फिजिकल अँथ्रोपॉलॉजीचा अभ्यास करताना इरावतीबाई संस्कृतीशास्त्राच्या झेत्रात उतरतात. मराठी संस्कृती, हिंदू समाज, भारतीय जातीव्यवस्था यावर भाष्य करतात. संयुक्त महाराष्ट्राला पाठिंबा देताना अल्पसंख्याक भाषिकांच्या हक्कांबाबत मंत मांडतात. आयुष्याच्या उत्तरार्धात जगण्याचा अन्वय लावताना त्या मुळांकडे म्हणजे ‘महाभारता’ कडे वळतात. ‘बॉय फ्रेंड’ विठोबापेक्षा त्यांना महाभारतातील गुंतागुंतीच्या नात्यांचा अन्वय महत्वाचा वाटतो. कर्व्यांच्या घरातला ‘मनाला जे पटेल ते करणे’ हा संस्कार उत्तरार्धात त्यांनी आत्मसात केलेला दिसतो.

दुर्गाबाईंच्या धारणा मात्र भिन्न आहेत. आध्यात्मिक गूढतेचा  स्पर्श त्यांना झाला आहे. म्हणूनच ‘पैस’ मध्ये त्यांना ‘ज्ञानदेव’ नुसते भावत नाहीत तर ‘सहनसिद्धी’, ‘दु:खकालिंदी’ सारख्या ज्ञानेश्वरिय शब्दांची त्यांना भूल पडते. राजारामशास्त्री भागवतांचा परखड वारसा दुर्गाबाईंना लाभलेला आहे. जशी इरावतींची नाममुद्रा डेक्कन कॉलेजवर तसा दुर्गाबाईंचा ठसा एशियाटिकवर उमटलेला आहे. जे इरावतींनी कधी केलं नाही ते पुढच्या पिढीशी जोडून घेण्याचं काम दुर्गाबाईंनी इथेच केलं.
सर्वात शेवटी जो मुद्दा मी मांडणार आहे तो आहे या दोघींच्या स्रीवादी संदर्भातील मतांचा.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला या दोघींचा जन्म झाला. इरावतीबाई त्यांच्या जागतिक वास्तवाच्या परिचयामुळे पाश्च्यात पद्धतीने अनेक गोष्टी करायच्या.त्यांच्या आयुष्यात हा आधुनिक स्रीवाद लगेच नजरेत येतो. दुर्गाबाई या त्या अर्थाने अधिक परंपरावादी आणि आध्यात्मिक. त्या स्रीलाही प्रथम माणूस म्हणून तपासतात. आणि तिच्या कोणत्याच विसंगतीमुळे डोळेझाक करीत नाहीत.स्रीमुक्तीवाल्या बायकांबद्दल त्यांची मंत पुरुषांपेक्षाही अधिक टीकात्म आहेत. सेक्शुअल स्वातंत्र्याबाबत इरावती कर्वे अधिक मोकळ्या तर दुर्गाबाई काही प्रमाणात कन्झर्वेटीव आहेत. दोघींना स्वयंपाक करण्याची आवड. पण दुर्गाबाईंना शिवण, टिपण, भरतकाम, खादी, स्वंयपाक हे सारेच क्षेत्र हौशीचे आणि आवडीचे. तर इरावतीबाई त्या सा-या क्षेत्रात अलिप्त इरावतींचा ग्राफ मला नेहमी वयानुरूप वाढणारा वाटतो. तर दुर्गाबाईचा वेगवेगळ्या उंचवटे आणि खोल गर्तांनी भरलेला.

प्रचंड रॅडीकल, नव्यानं मांडणी करणारा, आयुष्याचा अतिमूलभूत विचार करायला लावून सारं बदलवून टाकणारा असा विचार या दोघींनी मला दिलेल्या नाही. मात्र नेमाड्यांच्या भाषेत सांगायचं तर ‘स्वहिताचं भान बाळगून’ सतत कामात एकाग्र राहण्याची, व्यग्र राहण्याची शिस्त आणि त्या कामाबद्दल अत्यंत नेटकेपणाची आणि निगुतीची धारणा या दोघींकडून शिकण्यासारखी आहे.

इरावतींचा अलिप्त मातृभाव, इमोशनली अस्ताव्यस्त अशा देशस्थ घरात वाढल्यामुळे मला हवासा वाटतो.तर दुर्गाबाईंचा खाष्ट तिरसटपणा आणि निस्पृहता मला आदरणीय वाटते. ज्ञानमार्गावरून चालू इच्छिणा-या बाईनं पुरुष आपला मानू नये. पोरं आपली मानू नयेत, संसार आपला मानू नये- फक्त स्वायत्तता आपली मानावी आणि ज्ञानयज्ञ निग्रहानं चालू ठेवावा हे या दोन बायांकडून शिकण्याचा माझा प्रयत्न आहे.
                         
( प्रथम प्रसिद्धी 'शब्द दीपोत्सव 2012)