Thursday, May 27, 2010

कवितेचं नामशेष होत जाणं...

एकविसाव्या शतकाचं पहिलं दशक तर संपलं. कशासाठी लक्षात राहतील ही दहा वर्षं? जगाच्या स्मृतित जसे 9/11, त्सुनामी, ओबामाची निवडणूक, डॉलीचा क्लोन राहिले - तशी कशासाठी लक्षात राहतील ही पहिली दहा वर्षं? म्हणजे उदाहरणार्थ, मराठी भाषेसाठी, मराठी साहित्यासाठी या दहा वर्षांत काय झालं? मराठी कवितेसाठी हे दशक कशासाठी लक्षात राहील? लाडक्या कवींच्या मृत्यूमुळे की मराठी कवितेच्याच नष्ट होण्याच्या प्रक्रियेमुळे?
अरूण कोलटकर, दिलीप चित्रे, अरूण काळे, भुजंग मेश्राम या कवींच्या जाण्यानंच लक्षात राहणार का गेलं दशक? की सकस मराठी कवितेच्या दुर्मिळ होत जाण्यानं?
हे सगळं मनात झरझर आलं कारण नामदेव ढसाळांचं 'निर्वाणा अगोदरची पीडा' वाचलं म्हणून. ज्यांच्या कवितेनी झोप उडवली, घसा कडू जहर केला, 'छबुकलं दारिद्रय' ज्यांनी लिहिली, ज्यांच्या कवितेतल्या उद्रेकानं काळजात काहिली पेरली त्या नामदेव ढसाळांनी या दशकात जी कविता लिहिलीय, ती या दशकालाच साजेशी आहे. फ्रॅगमेंटेड. ढसाळांची कविता जिथे जाऊ शकते तिथे न जाणारी. यात ढसाळांचे कित्येक तुकडे विखुरलेयत - त्यांचं आजारपण, 'विलासराव देशमुख, पतंगराव कदम, सुशीलकुमार शिंदे'- अशी अर्पण पत्रिका, मल्लिका बरोबर लिहिलेल्या 'गोमू संगतीनं' दोन कविता - अनेक नामदेव ढसाळांनी ही 'निर्वाणा अगोदरची पीडा' प्रत्यक्षात आणलीय. त्यात एक ढसाळ गेल्या दशकातल्या मृत कविंचे मृत्यू जिव्हारी लागलेले ढसाळही आहेत. म्हणजे यात त्यांच्या चित्रे-कोलटकरांच्यावरच्या साठीच्या कविताही आहेत.
गेल्या दशकातल्या कवितेच्या वैराणपणाचं दुखरं कारण मला वाटतंय, ते म्हणजे पोस्ट मॉडर्न, पोस्ट इंडस्ट्रियल, पोस्ट सर्व काही, फ्रॅगमेंटेड अस्तित्व. गेल्या दशकात ज्यांनी कवितासदृश काही लिहिलं त्यांनी या एका कालरेषेवर वेगवेगळी आयुष्यं, एकाचवेळी जगण्याचा अट्टाहास नोंदवलाय. परंतु तो अट्टाहास आणि त्याच्या नोंदी म्हणजे कविता नाही हे त्या कविता-सदृश लेखकांनाही मनातून कळलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या कविता सदृश लेखनाची कडवट टीका करण्यात हशील नाही.
चिरीमिरी, भिजकी वही, अभुज माड, ग्लोबलचं गावकूस, नंतर आलेले लोक - या दशकातला महत्त्वाच्या कविता त्या छापल्या जरी 2000 नंतर तरी बहुतेक आधी लिहिल्या गेलेल्या आहेत. (कदाचित अरूण काळयांच्या काही कवितांचा सन्माननीय अपवाद वगळता.)
सध्याची फॅशनेबल चाल म्हणजे सा-या दुखण्याचं निदान 'सुमारांची सद्दी' या ढोबळ कॉईनेजनं करायचं. मला ते पटत नाही. सर्व काळात सदा सर्वदा सुमार कवी असतातच... पण सदा सर्वकाळ सळसळत खरी कविताही लिहिली जात असते. त्या कवितेचं या दशकात काय झालं?
रॅण्डम मला असं वाटतं - की जितकं इंटरनेट, फेसबुक, मोबाईल फोन, टेक्स्ट मेसेजिंग, व्हर्च्युअल अस्तित्व वाढतंय तितकी एकसंध व्यक्तिमत्त्वच नामशेष होतायत. प्रत्येक जण जेवताना टीव्ही बघतोय, टीव्ही बघताना फोन घेतोय, फोनवर ऐकताना एसएमएस पाठवतोय, मेल चेक करतोय, इन्टेन्स फिलिंग जगणं आणि ते भावोत्कट पानांवर/स्क्रीनवर उतरवणं क्रमश: दुर्मिळ होतंय. किंवा एकच व्यक्तिमत्त्व कवी, राजकारणी, प्राध्यापक अशा पन्नास भूमिका निभावतंय. यातून कविता कशी निर्माण होणार?
कालच एका कवितासदृश लेखनात प्रियकराशी बोलताना टीव्ही बघणारी बाई दिसल्यावर तर या हायपोथेसिसला बळकटीच मिळाली. मग वाटलं, अरूण कोलटकरांनी अशा मॉडर्निटीला कायम अंतरावर ठेवलं म्हणूनच तो माणूस खरी कविता लिहू शकला का काय? फेसबुकवरचं व्हर्च्युअल अस्तित्व, टिङ्कटरवरचे मतामतांचे गलबले, हजारो इच्छांची टोकं विणता विणता 'वामांगी' सारखी कविता शक्य तरी होईल का?
किंवा मला अत्यंत आवडणा-या मराठीतल्या दोन कवयित्री - सुचिन्हा भागवत जिनं आपलं अस्तित्व आणि त्याच्या गुंतागुंतीला दुस्तर आयडेंटिटीतून दूर ढकललंय आणि मेघना पेठे जिच्या व्हर्च्युअल मिडिआतल्या मौनानं मला कायम चकित केलंय, या दोन्ही व्यक्ती जिवंत, सळसळत्या कविता का लिहू शकतायत? मेघनाची अर्थात 'मी नाय साला तुझी बायको होणार' ही एकमेव कविता या दशकातली आहे - पण ती महत्त्वाची मानावी इतकी ऐतिहासिक आहे.
एकीकडून जगणं तपासत जाताना पोस्ट इंडस्ट्रियल जगण्याची कंपल्शन्स जशी लक्षात येतायत - तितकी कवितेच्या दुर्भिक्ष्याची ओळख नव्यानं व्हायला लागलीय. कवितेसारखं दिसणारं बरंच काही लिहिलं जातंय - पण त्या कविता नाहीत. निखळ कवितेसाठी व्हर्च्युअल प्रलोभनांना दूर ढकलायचं किंवा निदान कवितेपुरतं तरी त्यांना दूर ढकलून आपण दुसरंच व्हायचं - अशा स्ट्रेटेजीज लक्षात येतायत. कदाचित म्हणूनच सकस मराठी कवितेचं केंद्र आता वेगळया गावांकडे सरकायला लागलंय. जरी पुरस्कारांना तिथपर्यंत पोचायला वेळ लागणार असला तरी.
अरिझोनातला मध्ययुगीन जपानी कवितेचा प्रोफेसर फोर्ड यांचा वर्ग मला आठवतोय. धर्म आणि कला अशी फारकत न झालेला जपानी कवितेचा तो काळ. कवी तिथे त्याच्या पूर्ण झेन असण्यात उमलून यायचा. प्रोफेसर फोर्ड त्या कविता शिकवताना माणसाचं विखुरलेपण आणि एकसंघ होण्याची तगमग ह्याबद्दल सांगायचे. संस्कृती जगण्याच्या निरगाठींची उत्तरं कशी कवितेत शोधते याचं फोर्डगुरूजींचं प्रवचन मला अजून आठवतंय. हायकू आणि बुध्दाला उमजलेली नित्यशून्यता यांचं नातं अधिक लक्षात येतं.

सकस कवितेचं नामशेष होत जाणं म्हणजेच सकस 'मी' नावाच्या भूमीचं पूर्ण खालसा होणं. ती निरगाठ न उकलताच - त्याचं शंभर निरगाठींसकट तगमगत राहाणं. ग्लोबलच्या गावकुसात 'कविता' मरण्याचं कारण हेच आहे का काय?
माझ्या लाडक्या कविंच्या नसण्यानं - म्हणजे विंदा, चित्रे, कोलटकर, अरूण काळे, भुजंग मेश्राम यांच्या नसण्यानं हे शतक सुरू झालंय - या नंतर? मराठी भाषेला युनिकोडमध्ये जगवताना कवितेच्या नसण्याकडं कोणाचंच लक्ष जाणार नाहीए का काय? की भाषा जगवताना कवितेचा सायलेंट मृत्यू हा इश्चेनिया आम्ही मान्य केलाय बहुधा.
'निर्वाणा अगोदरच्या पीडे'मध्ये ढसाळांचे फ्रॅगमेंट म्हणतंय - तसंच म्हणावं लागेल मग कदाचित, ''किती कडू असतं, हतबल माणसाचं जगणं'' - आणि हतबल वर्तमानात कवितेनं ठार नामशेष होत जाणं.

Thursday, May 20, 2010

मायाजालात 'इंटरनेट हिंदू'

इंटरनेटवरच्या घडामोडी कित्येकशे पटींनी वाढल्या आहेत. इंटरनेटच्या जगातल्या एका वादामुळे गेल्या आठवड्यात अनेक चर्चा झाल्या. त्या वादाच्या परीक्षणातून आपल्या भवतालाकडे बघण्याची, तो तपासण्याची संधी मिळाली. वाद सुरू झाला 'इंटरनेट हिंदू' या वाक्प्रयोगातून.
दिल्लीतील 'इंडिया इंटरनॅशनल'मधल्या कॅज्युअल चर्चाही बातम्या होतात. तसेच, इंटरनेटवरील काही वर्तुळांतले कॉईन शब्द तत्काळ प्रतिष्ठित कॉलम्समध्ये जातात!
CNN-IBN वरच्या पत्रकार सागरिका घोष यांनी आपल्या टि्वटरवरून 'इंटरनेट हिंदू' या 'जमाती'ला प्रथम ललकारले. सागरिका यांनी टि्वटरवरच्या मतप्रदर्शनात 'इंटरनेट हिंदू' जमातीतल्या लोकांना शिव्या घातल्या, तेव्हा त्यांनी सारे 'इंटरनेट हिंदू' कसे तिय्यम दर्जाचे आहेत असे सांगत अजून पाच-पन्नास वेळा टि्वट केले. त्यांचे एक टि्वट माझ्या चांगल्या लक्षात राहिले. त्या लिहितात, ‘इंटरनेट हिंदू’ हे चवताळलेल्या माश्यांच्या झुंडींसारखे आहेत. मोदी, पाकिस्तान, मुस्लिम हे शब्द वाचले की या माश्यांची झुंड हल्ला करते.'' सागारिकला 'इंटरनेट हिंदूं'बाबत वाद-चर्चा करण्यापेक्षा त्यांना उचकावण्यात जास्त रस आहे असे माझे मत झाले आहे.

कांचन गुप्ता यांनी कॉइन झालेल्या या शब्दावर 'सण्डे पायोनियर'मध्ये लेख लिहिला. त्यांनी अमेरिकेत अथवा भारतात दिल्ली, चेन्नई अशा शहरांत स्थिर, झालेले उच्चशिक्षित उच्चभ्रू 'इंटरनेट हिंदू' हे स्युडो सेक्युलरिस्टांना कसे जागेवर ठेवतात याचे वर्णन आणि समर्थन केले आहे. भारतीय प्रसारमाध्यमे, विशेषतः सीएनएन-आयबीएन, एनडीटीव्ही ज्या पध्दतीने 'हिंदुत्वा’चे खंडन करतात ते 'इंटरनेट हिंदूं'ना आवडत नाही आणि ते इंटरनेटच्या माध्यमातून टि्वट्स, ब्लॉग्ज, यांच्यावर आपापली मते मनसोक्त प्रकाशित करतात. राजदीप सरदेसाई, बरखा दत्त, सागरिका घोष यांच्या ब्लॉग्जवर 'इंटरनेट हिंदूं'च्या तिखट प्रतिक्रिया वाचायला मिळतात. माध्यमांची भूमिका एककल्ली आहे आणि पत्रकारांना जनतेला माहिती देण्यापेक्षा, त्यांना आपली मते लादण्यात जास्त रस आहे असे या 'इंटरनेट हिंदूं'चे मत असते. त्यामुळे सागरिका घोष यांना त्यांच्या 'डाव्या' मतांबद्दल शिव्या घालणे यात 'इंटरनेट हिंदूं'ना गैर वाटत नाही आणि 'इंटरनेट हिंदूं'ना कमी लेखण्यात सागारिकला काही कमी वाटत नाही.
हिंदुत्ववाद ऐंशी आणि नव्वदच्या दशकांत जेव्हा वाढत होता तेव्हा डाव्यांना 'दंगलखोर शिवसैनिक' आणि 'अर्ध्या पँटीतले संघवाले' ही दोनच हिंदू रूपे ठाऊक होती. उलट, डाव्यांकडे इंटेलेक्चुअल्स, कामगार, कलाकार, सोविएत प्रणित फंडिंगवर जगणारे अनेक मान्यवर लेखक अशी जी विविधता होती, त्यापेक्षा कित्येकपट सरधोपट आणि अल्पसंख्य ओळख 'हिंदू' मते मांडणा-या समुहात होती. संजय पवार यांच्या 'कोण म्हणतं टक्का दिला?' नाटकामधला सोमनाथ मंदिराची पुनःपुन्हा आठवण काढणारा भाऊ हा या 'इंटरनेट हिंदूं'चा पूर्वसुरी मानता येईल!
मात्र हे गणित नव्वदच्या दशकानंतर बदलले. इंटरनेटचा वापर ऍकॅडमिक संस्थांमधून मोठया प्रमाणावर चालू झाला आणि समाजशास्त्रीय, राज्यशास्त्रीय संशोधन अशा ज्या क्षेत्रांत बहुतांश डाव्यांची मक्तेदारी होती त्या विषयांवर इतर विद्याशाखांतील माणसेही आपापली मते व्यक्त करू लागली. इंटरनेटमुळे प्रथमतः मानव्य शाखा आणि इंजिनीयरिंग, प्युअर सायन्स रिसर्च, तसेच व्यवस्थापन क्षेत्रातील उच्चपदस्थ या सा-यांना एकत्र व्यासपीठ निर्माण झाले. तोपर्यंत मानव्य शाखांत संशोधन करणा-या व्यक्तींना त्यांचा 'स्वायत्त' डावा कोष होता. आयआयटीत डावे-उजवे गट होते, परंतु ते हॉस्टेलमध्ये रात्र रात्र जागून केलेल्या भांडणांपुरते. y2k नंतरच्या काळात पदव्युत्तर शिक्षण घेतलेले, मानव्य शाखांचे शिक्षण नसलेले, मध्यमवर्गीय आणि उच्च वर्गीय, IT क्षेत्रांत घुसलेले घोडागिरी स्पेशालिस्ट (सॉरी, म्हणजे बॉडीशॉपिंगच्या माध्यमातून अमेरिकेत जाऊन फारसे महत्त्वाचे काम न करणारे असे लोक) यांची मोठी फळी इंटरनेटवर कार्यरत झाली. यांत काही अतिशय स्मार्ट आणि इंग्रजीवर प्रभुत्व असणारेही होते.
या फळीला डाव्यांनी वर्षानुवर्षे उराशी कवटाळलेली समाजवादसुलभ मते पटायची नाहीत आणि तिथूनच 'स्युडो सेक्युलारिस्ट' या विशेषणाचा इंटरनेट वापर वाढलेला दिसून येईल.
पूर्वी 'याहू ग्रूप्स'वर वाद चालायचे. हे 'याहू ग्रूप्स' भारतीय संस्कृती, इतिहास, संगीत इत्यादी गोष्टींवर चर्चा करायचे. एखाद्या 'याहू ग्रूप'वर हजारो माणसे जरी मेंबर असतील तरी त्यांतले व्यक्त होणारे दहा-पंधरा जणच असायचे. बाकीचे वाचक असायचे. 'इंटरनेट हिंदूं'चा पहिला जन्म झाला तो या 'याहू ग्रूप्स'वर. इथे प्रथम मी मुंबईतल्या ९२सालच्या अयोध्येनंतरच्या दंगलीबद्दलची चर्चा ८४च्या शीख दिल्लीतील दंगलींपर्यंत गेलेली वाचली किंवा रोमिला थापर यांना मनसोक्त शिव्या घालणा-या लेखकांचे ताशेरेही वाचले.
अनेकांनी 'याहू ग्रूप्स'मधून फुटून आपापले गट तयार केले. यात 'सॉनेट'चा (म्हणजे साऊथ एशियन विमेन्स नेटवर्क) उल्लेख करते. 'याहू ग्रूप्स'ना कंटाळून लिबरल डाव्यांनी आपली वेगळी चूल मांडणे सुरू केले. 'सॉनेट'वर तर फक्त स्त्रिया पोस्ट करू शकायच्या. या सा-या ग्रूप्समध्ये इंग्रजीवर प्रभुत्व असणा-या दोन-चार 'इंटरनेट हिंदूं'ची आणि लिबरल डाव्यांची सतत जुंपायची. दरम्यान, 'सुलेखा' या पोर्टलचा जन्म झाला. अनेक अनिवासी भारतीयांना 'सुलेखा'मुळे आधार मिळाला. त्यावर क्लासिफाईड्स होत्या, लग्ने जमवण्याची सोय होती; शिवाय ब्लॉग आणि चर्चा करण्यासाठीही जागा होती!
भारतातल्या भाजप सरकारच्या काळात, जेव्हा 'इंडिया शायनिंग' होता तेव्हा 'इंटरनेट हिंदूं'नी आघाडी घेतली. सुलेखावर त्या काळात झालेले 'आर्यांचे आक्रमण खरे की खोटे?', 'सिंधु संस्कृतीचा प्रश्न', 'प्राचीन भारतीय संस्कृतीची मूल्ये' या विषयांवरचे वाद मला आठवतात.
इन्फिनिटी फाऊंडेशनचे राजीव मल्होत्रा, बापा राव, संक्रांत सानू ही मंडळी तत्कालीन समाजात 'इंटरनेट हिंदूं'चे काम करत. डाव्यांच्या सेक्युलर तुच्छतावादाला इंटरनेटवरून दिलेले हे जहाल 'हिंदू' प्रत्युत्तर होते. त्या सुमारास झालेले दोन-तीन वाद महत्त्वाचे होते.
शिकागो विद्यापीठात वेंडी डोनिजर या प्राध्यापिका शिकवतात. अमेरिकन विद्यापीठात रिलिजन, रिलिजस स्टडीज या विषयांचा 'सेक्युलर' व ‘धार्मिक', दोन्ही अंगांनी अभ्यास होतो. यामध्ये अनेक वर्षे डोनिजरबाईंनी भारतीय हिंदू धर्माबद्दल लेखन, संशोधन केले आहे. मात्र पूर्वी, अशा त-हेचे लेखन केवळ विद्यापीठीय वाचनापुरते मर्यादित होते. Y2k नंतरच्या जगात उच्चविद्याविभुषित, भारतीय संस्कृतीवर प्रेम करणा-या लोकांनी डोनिजरबाईंची पुस्तके वाचली. त्यांना त्यातले भारतीय देवी-देवतांबद्दलचे उल्लेख असह्य झाले. वेंडी डोनिजर, पॉल कार्टेराईट, जेम्स लेन या तीन, 'रिलिजन' या विद्याशाखेत संशोधन करणा-या लेखकांवर ‘सुलेखा’वरून सडकून टीका करण्यात आली. नंतर त्याचेच पर्यवसान वेंडी डोनिजरवर अंडी फेकण्यात किंवा भारतात जेम्स लेनच्या पुस्तकावरून वादळ उठवण्यात झाले. 'इंटरनेट हिंदूं'चे हे शक्तिप्रदर्शन होते.
गेल्या आठवड्यात अशोक मलिक यांनी 'हिंदुस्थान टाइम्स'मध्ये 'व्हेन द फ्रिंज बेनिफिट्स' म्हणजे जेव्हा अल्पसंख्यांचा फायदा होतो असा कॉलम लिहिला, तेव्हा त्या कॉलममधून त्यांनी 'इंटरनेट हिंदू'चा पुन्हा उल्लेख केला.
अशोक मलिक यांच्या मते, भाजपप्रणित हिंदू फळीला वाव राहिलेला नसल्यामुळे ते आता 'इंटरनेट अँक्टिव्हिजम' करत आहेत.
कांचन गुप्ता यांचे मत वेगळे आहे. त्यांना या 'इंटरनेट हिंदूं'ना कमी लेखायचे नाही. माध्यम आणि शिक्षणव्यवस्थेतली डाव्यांची दादागिरी हे 'इंटरनेट हिंदू' मोडीत काढतात असे त्यांना वाटते.
'याहू इंडिया'वरचा अमित वर्मांचा कॉलम आणि मला आवडणा-या 'सेपिया म्युटिनी' या ब्लॉगवरची मते मात्र मला या संदर्भात फार आवडली. अमित वर्माने सागरिका यांच्या दुख-या भागावर बोट ठेवले. इंटरनेटवर 'ट्रॉल' नावाची एक जमात असते. तुमच्या मतांना विरोध करून, अत्यंत ग्राम्य भाषेत तुमच्याबद्दल लिहून तुम्हाला भडकावणे एवढेच 'ट्रॉल'चे काम असते. इंटरनेटवर ज्यांनी अनेक वर्षे काढली. त्यांनी या 'ट्रॉल'बरोबर वाद न घालता त्यांना दुर्लक्षून मारून टाकावे असे बेसिक ट्रेनिंग आवश्यक असते. हे ट्रेनिंग इंटरनेटवर मते व्यक्त करणा-या प्रत्येकाला हवे असे अमित वर्मांचे मत आहे. अमित वर्मा 'डुकरांबरोबर कुस्ती खेळू नये. तुम्हाला चिखल लागतो आणि डुकरांना मज्जा येते!' असे मूळ तत्त्व सांगतात.
पण त्याही पलीकडचे सुंदर निरीक्षण नोंदवले गेले आहे, 'सेपिया म्युटिनी'वर. इंटरनेटवर माणसे वास्तवात आहेत, त्यापेक्षा जास्त अतिरेकी वागतात. शिवाय, समविचारी ब्लॉगर किंवा प्रतिक्रिया लिहिणारे भेटले की त्यांची मते अहमहमिकेने अधिक जहाल बनत जातात. या जहालपणाची चढाओढ चिन्ह जगतात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी होते. मात्र इंटरनेटवरचा अतिरेकीपणा ही केवळ 'इंटरनेट हिंदूं'ची मक्तेदारी नाही असे 'सेपिया म्युटिनी'वर म्हटले आहे. इंटरनेट मार्क्सिस्टस्, इंटरनेट ज्यू, इंटरनेट मुस्लिम असे अनेक प्रकारचे ‘कडवे वाल’ इंटरनेटवर जन्माला आलेले आहेत. यांच्या जन्माचे कारण म्हणजे त्यांची 'अस्मिते'ची भूक आहे. या नव्या अस्मिता समजून घेणे आवश्यक आहे. बदनामीचे एक साधन म्हणून इंटरनेट वापरता येऊ शकते, म्हणूनच केवळ 'इंटरनेट हिंदूं'ना खडयासारखे वेगळे काढता येणार नाही.
माध्यमांकडे, अँकॅडॅमिक्समध्ये पूर्वापार असणारी डाव्या विचारसरणीची वैचारिक दादागिरी नव्या पिढीला चालत नाही. मनसेच्या राड्यानंतर किंवा मिरजेच्या दंगलीनंतर तरुण मुले इंटरनेटवरून आपापली मते त्वेषाने मांडताना दिसतात. 'इंटरनेट हिंदूं'ची ही जनरेशन नेक्स्ट आहे. मनसेचे इंटरनेट मनसैनिक 'राजसाहेबांना' ज्या प्रकारे मानतात ते बघितल्यावर येणा-या काळाची चुणूक दिसते.
मात्र या माध्यमात अशा त-हेच्या नव्या अस्मिता जन्माला येताना बरेच काही शिकण्याजोगे आहे. 'महाराष्ट्र माझा' या शिरीष पारकरांच्या साप्ताहिकाच्या प्रकाशनाच्या वेळी राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी टर्मिनसचा उल्लेख 'व्हीटी' असा केला. ही बातमी टि्वटरवरून पसरताच इंटरनेट मनसैनिक सरसावले. ही तरुण पिढी किती वेगळी आहे बघा! त्यांतले अनेक जण म्हणाले, की 'राजसाहेबांनी व्हीटी म्हटले असेल तर ते चूक आहे. त्यांनी 'सॉरी' म्हणावे म्हणजे प्रश्न मिटला.' नेत्यांकडे, त्यांच्या राजकारणाकडे खुलेपणाने बघणारी ही तरुण पिढी इंटरनेटवर व्यक्त होत आहे.
अशा तरुण पिढीला अतिरेकी डावी मते मांडून स्वतःला स्नॉब समजणा-या सागरिका आवडणार नाहीत. तसेच, दुसरीकडे त्यांना श्रीराम सेनेचा मूर्खपणा किंवा संघिष्ट -हेटॉरिकल प्रतिवादही आवडणार नाही. 'इंटरनेट हिंदू', इंटरनेट ज्यू, इंटरनेट मराठी हे इंटरनेटवरी कडवे अस्मितावादी; परंतु ते त्यांच्या व्यवहारात अतिशय सेक्युलर असू शकतात, किंबहुना असतातच. इंटरनेटवर त्यांनी आपल्या कडवेपणाने लिबरल कडवेपणाला शह दिलेला असतो. इंटरनेट नावाच्या मायाजालातल्या या नव्या शक्यता आहेत. नेटवरच्या नव्या समीकरणांत पन्नाशीकडे झुकलेले जुने डावे, जुने समाजवादी, जुने हिंदू, जुने जहाल, कोणीही टिकणार नाहीत. आता नवे प्रॅग्मॅटिक जहाल इथे निर्माण होतील आणि स्वतःला शहाण्या समजणा-या प्रत्येक व्यक्तीचे राजकारण तपासून बघतील. त्यांचे विचार इंटरनेट माध्यमातून समाजमनात झिरपत जातील.
खरी ओळख लपवणे इंटरनेटमुळे शक्य होते. त्यामुळे इंटरनेटचे जग हे प्रत्येक सामाजिक व्यक्तीचे वाभाडे काढू शकेल. शेवटी, आपल्याला कोणत्या डुकरांशी कुस्ती खेळायची आहे की त्यांना सॉक्रेटिक शहाणपणापर्यन्त न्यायचे आहे हा असेल ज्याचा त्याचा प्रश्न!

Saturday, May 8, 2010

गुरुदेवांना आठवताना

महाराष्ट्राला पन्नास वर्षं पूर्ण होतायत. या सुवर्णमहोत्सवी वर्षात राज्यासमोरच्या अनेक प्रश्नांवर चर्चा होतायत. महत्त्वाच्या प्रश्नांचं विश्लेषण अगत्याचंच आहे.
मी एका दुर्लक्षित अभावाकडे लक्ष वेधू इच्छिते. आपल्या जगण्यातून क्रमश: नाहीशा होणार्या सुंदरतेचा अभाव मला अस्वस्थ करतो. माणसा-माणसातली, निसर्ग आणि माणसातली, शासन आणि नागरिकांमधली असुंदर नाती अंगावर काटा आणतात. वास्तवाच्या या कुरूप दर्शनानं अस्वस्थ होण्याचं एक महत्त्वाचं कारण किंवा या अभावाची प्रकर्षानं जाणीव होण्याचं कारण म्हणजे 7 मे रोजी येणारी रविंद्रनाथ टागोरांची जयंती. रविंद्रनाथांच्या जन्माला यावर्षी दीडशे वर्षं पूर्ण झाली. त्या सौंदर्यपूजकाची आठवण काढताना, जगण्यातल्या सौंदर्यांच्या अभावाची आठवण होणं अपरिहार्य! एकेकाळी अभिजात कलेच्या क्षेत्रात नावाजलेल्या महाराष्ट्रात सध्या ज्या प्रकारचं राजकारण, समाजकारण संस्कृतिकारण, भाषाकारण चालू आहे ते बघता सौंदर्यांची, सुंदरतेच्या मूल्याची साधी आठवणही कोणाला राहिली आहे असं वाटत नाही. आणि हा सुमारपणा आमच्या धोरणांपासून ते संस्कृतीच्या नावावर चाललेल्या अत्यंत भंपक अस्मिताकारणातूनही दिसतोय.
पण, रविंद्रनाथांना आठवताना, मूळ मुद्दा केवळ राजकीय नाही; तर तो त्या पलीकडचा आहे. एक कारण मला असं जाणवतंय, की सामाजिक नेतृत्व हे गांधीवादी, समाजवादी, डाव्या चळवळींशी निगडित असल्यानं अनेकांना 'सत्यासाठी लढा' हे मूल्य महत्त्वाचं वाटतं. ते लढाऊ मूल्य मराठी मातीत रुजलेलं आहे. नरेंद्र दाभोळकर, मेधा पाटकर, डॉ. अभय बंग... कित्येक जण लढयात दिसतात. मात्र कलात्मक विचार केंद्रस्थानी मानणार्यांळचा ठार अभाव प्रत्ययाला येतो.
कलेला केंद्रस्थानी मानणारा सौंदर्यविचार हा 'एलिटिस्ट' म्हणून जणू काही नाकारण्यायोग्य आहे अशी चुकीची समजूत सार्वत्रिक पसरलेली दिसतीय. यामागे अज्ञान आणि राजकारण, दोन्ही आहे. कलेचं क्षेत्र कार्यकर्त्यांनी एकीकडून नाकारायचं आणि दुसरीकडून ती फक्त एक अतिश्रीमंत वर्गाची मक्तेदारी बनायची, या दोन्ही प्रक्रिया महाराष्ट्रात घडताना दिसतायत.
एकीकडे मराठी चित्रकारांना, आर्किटेक्टस्ना, डिजायनर्सना उत्तम दिवस आलेत, तर दुसरीकडे भंपक दिवाळी अंक, सुमार साहित्य आणि 'सारेगमप'प्रणित संगीत मराठी संस्कृतीच्या केंद्रस्थानी आलंय. आपल्या आयुष्यातल्या असमतोलाचा आणि निसर्गातून, कलेतून आपलं वजा होणं यांचा संबंध आहे का? ते आपण तपासायला हवे. मात्र अनेकांना प्रश्न असा पडतो, की जगणं एवढे बकाल आणि भकास बनत जाताना, जीवनमरणाचे प्रश्न समोर असताना सौंदर्याचा विचार कसा सुचणार? तो तर पोट भरल्यानंतरच सुचतो. परवा क्लारीसा पिंकोला इस्टेस या लेखिकेचं 'वूमन हू रन विथ वुल्वज्' नावाचं अतिशय प्रभावी पुस्तक वाचताना याच विचारांचा पुन्हा प्रत्यय आला (बाय द वे अरुण कोलटकरांच्या 'भिजकी वही'तली 'हाडम्मा' याच पुस्तकातून आली) इस्टेस ही सायकोथेरपिस्ट आहे. आत्महत्येच्या टोकाला गेलेल्या रुग्णानं, तिला आपण आत्महत्या करायचं का नाकारलं? हे एकदा सांगितलं. ती म्हणाली, 'त्या उदास दिवशी मी एक कोळी अतिशय सुंदर जाळं विणताना बघितला, त्या सौंदर्यानं मी भारावले. जगण्याकडं पुन्हा वळले.'
इस्टेस म्हणते, मनातले अनंत कल्लोळ निवळवण्याचं सामर्थ्य निसर्गाच्या, सौंदर्याच्या क्षणकाळ दर्शनातही असतं. तरतरून बहरलेलं झाड, पावसानंतरचं इंद्रधनुष्य, सुंदरशी कविता, देखणं जगलेलं आयुष्य, एखादी कलाकृती, पहाटेच्या एकांतातला झाडांचा सहवास- निसर्गाच्या कलेच्या सौंदर्यकेंद्री जादूनं कित्येक मनं पुन्हा उभी राहताना तिनं बघितली. इस्टेस म्हणते, की अनंत न्युरॉसिस निवळवू शकेल असं मनाचं शांतवन करण्याचं सामर्थ्य सौंदर्यमूल्यात आहे.
त्या मूल्याचा अभाव म्हणून तर आपण बकाल आणि भकास, तोल हरवलेलं जगणं पदरात बांधून घेत नाही आहोत ना? रविंद्रनाथांच्या शब्दांत सांगायचं तर खरा सौंदर्यपूजकच खरा अहिंसक होऊ शकतो. हिंसेतली अपुरी कुरूपता तो जाणू शकतो. स्वत: रविंद्रनाथांनी अशी जातिव्यवस्थेतली कुरूपता जाणून तिला विरोधही केला होता.
सत्य आणि सौंदर्य ही म्युच्युअली एक्सक्लुझिव- म्हणजे एक असेल तर दुसरं नसेल अशा पर्यायी पठडीतली मूल्यं नाहीत. सत्यात साधेपणा, सरळपणा आहे. तो सुंदरच आहे आणि सौंदर्याचा आग्रहदेखील आपल्याला सत्यापर्यंत पोचवतो हे जाणणं, याचं भान पुन्हा एकदा येणं आवश्यक आहे.
गौतम बुध्दाचं अंतिम प्रवचन फक्त मौनात आणि एक अकारण सुंदर कमळाच्या दर्शनानं साजरं झालं. त्या देखण्या क्षणाचा अन्वय फक्त महाकश्यपाला लागला होता. अशा क्षणामधलं इन्टेन्स सौंदर्य आपल्याला समजावून सांगावं लागत नाही. ते कळतं, ते जाणवतं, ते आपल्याला माणूस बनवतं. मात्र त्याच्या अभावानं आताशा आपला जीव खंतावत नाही, घशात आवंढा येत नाही. आपण 'वो सब नही परवडता' म्हणून निमूट निघण्याची तयारी करतो.
रविंद्रनाथांच्या जयंतीच्या निमित्तानं, ज्यानं गांधींना 'महात्मा' म्हणून ओळखलं आणि ज्याला गांधींनी 'गुरुदेव' म्हणून जाणलं अशा कवीला पुन्हा आठवणं आणि त्याच्या 'सुंदरतेच्या साक्षात्कारा'चा परिचय तरी करून घेणं आवश्यक आहे. मराठी आणि माणूस दोन्ही बनवण्यासाठी!

My new column www.thinkmaharashtra.com titled Brihatkatha. You could read more on the site here..... http://www.thinkmaharashtra.com/think1/

Wednesday, May 5, 2010

वाचता वाचता

Keep in mind the old jungle saying, 'Never wrestle with a pig. You get dirty and the pig enjoys it.' The internet empowers loonies of all kinds by giving them a megaphone -- but no one is forced to listen to them. The noise-to-signal ratio is way out of whack on the net (Sturgeon's Law), and any smart internet veteran will tell you that to keep your sanity, you need to ignore the noise.

..While reading Amit Verma's viewfinder, came across his great insight.