Tuesday, June 3, 2014

मराठी साहित्यविश्वाचं ट्रेंडमॅपिंग



भविष्यकाळ हा शक्यतांचा प्रदेश असतो. अस्तित्वातच नसलेल्या काळामध्ये मराठी साहित्यविश्वात काय नवे पाहायला मिळेल, हा कितीही अभ्यासपूर्ण असला तरी कल्पनाविलासच. अनेकानेक मल्टिनॅशनल कंपन्या, राष्ट्रांची नियोजन मंडळे ‘सिनारिओ बिल्डिंग’ किंवा ‘ट्रेंड्स मॅपिंग’ करतात ते त्या बदलांना तयार राहाण्यासाठी किंवा त्या बदलांसाठी तरतूद करण्यासाठी. मराठी साहित्यविश्वाचं ट्रेंडमॅपिंग करायचं ते कुणासाठी? एक कारण मला दिसतं ते म्हणजे आपली समकालीन संस्कृती नवनिर्मितीला पोषक नाही. काय झाले असता ती अधिक उमदी, सृजनशील होईल याचा विचार करण्यासाठी ही कल्पनाविलासाची संधी वापरता येईल. सद्यकालीन मराठी साहित्यविश्वाच्या दूरवस्थेकडे बघता पुढील पंचवीस वर्षांसाठी काही अपेक्षा तरी व्यक्त करता येतील. ‘काहीही बदलणार नाही’ हा टिपिकल मराठी निराशावाद टाळून काही शक्यता जोखता येतील.

साहित्यकृती ज्या वातावरणात जन्म घेते ते वातावरण पुढील पंचवीस वर्षांत कसे बदलेल? साहित्यकृती रसिकांपर्यंत ज्या माध्यमातून पोहोचते त्या प्रसारित होण्याच्या पद्धती बदलतील त्याचा परिणाम साहित्यविश्वावर होईल का? आणि आशय आणि घाटाच्या, म्हणजे साहित्यकृतीच्या रचनेवरच पुढच्या पंचवीस वर्षांत काही बदल घडून येतील का? अशा तीन भागांमध्ये या ‘बदलाच्या शक्यता’ आपण बघू शकतो.
समकालीन सांस्कृतिक आणि सामाजिक वातावरण दुय्यम आणि तिय्यम दर्जाच्या साहित्यिकांसाठी अतिशय उत्तम आणि लाभदायक आहे. परंतु सक्षम साहित्यनिर्मितीला पोषक हे वातावरण नाही. साहित्यविश्वात बोकाळलेला जातीयवाद, ‘पॉलिटिकली करेक्ट’ या बॅनरखाली डाव्या विचारांकडे झुकणारी दांभिक विचारसरणी, कथनी आणि करणीमध्ये योजनांचं अंतर ठेवण्याची वृत्ती, जातीय विचार केंद्रस्थानी ठेवून निर्माण होणाऱ्या संहिता आणि वाटली जाणारी बक्षिसे हे सारेच वातावरण छाडमाड साहित्यनिर्मितीच्या उपयोगाचे आहे.

मराठी साहित्यविश्वातला हा वाङ्मयीन मूल्यांवरील निष्ठेचा अभाव आणि दांभिकता पुढील पंचवीस वर्षांत कमी होईल असे प्रथमदर्शनी तरी वाटत नाही. पत्रकार कुळातील लेखक आणि समीक्षक होण्याच्या या काळात मराठी विश्वात मूलगामी परिवर्तनाची अपेक्षा पुढील पंचवीस वर्षांत ठेवता येईल का?

साहित्यकृतींच्या प्रसाराची माध्यमे बदलताना दिसत आहेत. ऑडिओबुक्स, बुकगंगा असा नवा प्रवाह हळूहळू रुजतो आहे. इंटरनेटच्या माध्यमातून भाषेचे उथळ चलनवलन निश्चित वाढेल. मात्र गंभीर/उत्तम लेखनाला आवश्यक, ‘चिंतन आणि खोलीचा अभाव’ याच प्रवाहाबरोबर वाढेल असे लक्षण आहे. फेसबुक चर्चा, कादंबऱ्या, शोधनिबंध बघता सरकणाऱ्या फालतू टाईमलाईनवरचे लेखन कदाचित भरपूर उगवून येईल.
दुसरीकडे कॉपीराईट शहाणे-टाईप कृतीतून नवी आर्थिक समीकरणेही उदयाला येतील. लेख समाविष्ट केल्यावर किंवा कादंबरी छापल्यावर लेखकांना ‘न मागता’ पैसे देण्याची अक्कल प्रकाशकांना पुढील पंचवीस वर्षांत आली तर ‘पावले’ असे म्हणावे लागेल. जर प्रथम दर्जाचे लेखन, विशेषतः कथनात्म सकस साहित्य येत्या पंचवीस वर्षांत वाढले तर ‘प्रकाशक-लेखक’ नात्यातील प्रकाशकीय दादागिरी काही प्रमाणात आटोक्यात येईल. दिवाळी अंक, पुरस्कार, प्राध्यापकीय नोकऱ्या, कॉर्पोरेट कंटाळ्यावर उपाय, राजकारण्यांकडून पैसे वा मान उधार घेऊन उपकार परतफेड करण्यासाठी आजकाल कथात्म अथवा समीक्षात्मक साहित्याचा वापर होतो. या समकालीन ‘चाटू’ संस्कृतीला उद्ध्वस्त करणारं लेखन पुढील पंचवीस वर्षांत जन्माला येईल काय?

प्रत्येक साहित्यिक आणि समीक्षक विविध कळपांच्या दगडाखाली हात असल्यामुळे ‘क्षीण विरोध’ करत फेसबुकी नोंदी करतात. साहित्यिकदृष्ट्या अत्यंत भ्रष्ट साहित्य संमेलने, अध्यक्षांच्या निवडीचं राजकारण, दुय्यम गुणवत्तेच्या अध्यक्षांची निवड यामध्ये पुढील पंचवीस वर्षांत बदल व्हायला हवा, मात्र या बदलाची सुरुवात होईल कुठून?

आशय किंवा घाटाचे प्रयोग हे कालसापेक्ष नाहीत. ते लेखक आणि कवीच्या ऊर्जासापेक्ष आहेत. म्हणजे काय? तर पंचवीस वर्षांचा काळ, त्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रोमोझोमल बदल- कंद मनुष्यपणा बदलत नाहीत. त्या बदलांमुळे न लिहिणारे समूह, व्यक्ती लिहिते होतात- मात्र आशयात आणि घाटात खरी क्रांती होते ती लेखकाच्या तपश्चर्येतून.

एक आशा अशी आहे की भारतात नव्यानं येणारा पैसा, ग्लोबल संधी यामुळे लिहित्या व्यक्तीला चरितार्थासाठीचा पैसा कमावण्यासाठी विविध साधने उपलब्ध होतील यातून कदाचित लेखकाचे स्वातंत्र्य वाढेल, मिंधेपणा कमी होईल.

सद्यकाळात धरठावाचा अभाव आणि पुनर्लेखनाच्या शिस्तीचा अभाव यामुळे कादंबरीसारखं दिसणारं परंतु कादंबरीच्या पातळीला न पोहोचलेलं लेखन बजबजलेलं आहे. पुढील पंचवीस वर्षांत काही भागातल्या समाजकारणाच्या बदलांमुळे मन लावून लिहिणे, गद्याचा सखोल विचार करून, त्यावर संस्करण करून ते प्रकाशित करणे यासाठी आवश्यक नैतिकतेचा आणि धीराचा जन्म पुढील पंचवीस वर्षांत कदाचित पहावयास मिळेल.

अशी एक आशा आहे की साहित्य अकादमी असो किंवा गावोगावचे छडमाड पुरस्कार, ते तुम्हाला लेखक बनवत नाहीत. तर समकालीन लेखक म्हणून मिळणारी पुरस्कारग्रस्त प्रसिद्धी ही मोठ्या मापाच्या चड्डीसारखी आपसूक घरंगळणारी वस्तू आहे हे कळल्यानंतर समकालीन बऱ्या लेखकांना भान येईल. पुरस्कार आणि कळप यांना फाट्यावर मारून लेखक म्हणून आपण एक निश्चित भूमी मिळवू शकतो हा खरा, अस्सल देशीवाद पुढील पंचवीस वर्षांत जन्माला यावा अशी अपेक्षा आहे. मराठी भाषेची भूमी सकस आहे परंतु इथं ‘सनदी शेतकरी’ ‘हजारातुनी एखादाही’ दिसत नाही हे दुर्दैव.

शब्दातील, भाषेतील, विचारातील ताकद- ते शब्द, ती भाषा ते विचार मांडणाऱ्या व्यक्तीच्या सच्चेपणावर, तिच्या मूल्यनिष्ठांवर, विसंगती टिपू शकणाऱ्या तिच्या बुद्धिमत्तेवर, माणूस म्हणून जाणू शकणाऱ्या तिच्या करुणेवर आणि तिने स्वीकारलेल्या लेखनमार्गावरील प्रवासातल्या अथक एकल्या श्रमांवर अवलंबून आहे.

समकालीन संस्कृतीतला साहित्यिक प्रभावहीन आहे. या परिस्थितीची तरफ उलटवायची तर आशयाच्या नवनवीन प्रयोगातून वाचनीय (रंजक नव्हे) साहित्याची निर्मिती ही एकमेव गोष्ट लेखकाला प्रभाव क्षेत्राच्या केंद्राकडे घेऊन जाईल. त्या प्रक्रियेची सुरुवात कळपाचा आपल्या आतल्या समाधानाला शून्य उपयोग होतो या मूलभूत भानातून होईल अशी आशा मला आहे.

शेवटचा मुद्दा असा की, पुढील पंचवीस वर्षांत ज्या सावल्यांच्या आधारानं मराठी साहित्यसंस्कृती डौलानं उभी राहिली ते वटवृक्ष पृथ्वीतलावर नसतीलही- नेमाडे यांचं राजकारण वजावूनही उरणारी लेखनावरची प्रचंड निष्ठा, हेतूची सुस्पष्टता, फॉर्मचं अत्यंत नेमस्त भान, श्याम मनोहरांचा ज्ञानमार्गी वज्रपंथ, प्रयोग करण्याची आणि मांडण्याची प्रचंड क्षमता आणि त्यासाठी आवश्यक तपश्चर्या, नामदेव ढसाळांच्या (राजकीय आणि सामाजिक घटिया तडजोडी वगळता) प्रचंड ताकदीचं कवितेच्या ऊर्जेचं बळ याचा वारसा पुढे नेईल असे लेखनकर्मी पुढील पंचवीस वर्षांत तयार होतील का? तसं होण्यासाठी या समकालीन सभ्यतेतल्या कोंडमाऱ्याचं आकलन आपल्याला करून घ्यावं लागेल, त्यावर उपाय शोधावे लागतील.

राजकारणाला हाताशी धरून नेमाडे यांनी त्यांच्या प्रातिभ बळावर त्यांच्यापुरते उपाय काढले, श्याम मनोहरांनी ‘बेबी युनिव्हर्स’चे प्रयोग करत तुसडेपणानं स्वतःचा मार्ग शोधला- मात्र पुढील पंचवीस वर्षांत प्रथम दर्जाच्या निर्मितीक्षमतेवर सतत दुय्यम आणि तिय्यम दर्जाच्या कळपांचा विजय याचं गणित भेदून आपण पुढे जाऊ शकणार आहोत का?

यातल्या प्रवासातच नव्या वाचकाशी अधिक सत्य नातं निर्माण होण्याची बीजं रुजत जातील. सुरुवातीचे मर्ढेकर, नामदेव ढसाळ, मनोहर ओक यासारख्या कवींनी केलेला भाषेचा, तत्त्वज्ञानाचा लवचिक वापर, नव्या रुपकांची निर्मिती समकालीन कवितेत दिसत नाही. अरुण कोलटकरांसारख्या कवितांसाठी आवश्यक एकांतऊर्जा पुढील पंचवीस वर्षांत कवींकडे एकवटेल काय? या खरा प्रश्न आहे.

लेखनात, कथात्म साहित्यात समाज बदलण्याची ताकद असते मात्र त्याची पूर्वअट म्हणजे साहित्यिकांची डोकी आणि हृदयं जागच्याजागी लागतात.

उत्तर-भांडवलशाहीत मास (लोंढा) याऐवजी ट्राईब (छोटा एकजिनसी बुद्धिमान समूह) सर्व मार्केटिंग संकल्पनांच्या केंद्रस्थानी येऊ लागला आहे. ब्रुस नुसब्राऊमे ‘क्रिएटिव्ह इंटेलिजन्स’ किंवा टॉम केलीचे ‘क्रिएटिव्ह कॉन्फिडन्स’ ही दोन पुस्तके व्यावसायिक क्षेत्रातील सृजनशीलतेची महत्ता अधोरेखित करतात.

या वातावरणात पुढील पंचवीस वर्षांत मराठीतील लिहिती, विचार करती, वाचती व्यक्ती क्षुद्र राजकारणापलीकडे छलांग मारू शकली तर मराठी साहित्यात नवीन निर्मला पुतुल, नवा मार्खेज, नवा मुराकामी, नवा चक्रधर, नवा मर्ढेकर- नवा नवा साहित्यिक, पहिल्या धारेचा आणि ओरिजिनल जन्माला नक्कीच येऊ शकेल! (जन्माला आला असेल तर संस्कृतीच्या केंद्रस्थानी येऊन प्रभावही टाकू शकेल हे निश्चित!)
---

 (प्रथम प्रसिद्धी चित्रलेखा साप्ताहिक)

सोरेंटिनोचा ‘द ग्रँड ब्युटी’





जानेवारी महिन्यात पुण्यात पिफ महोत्सव आयोजित करण्यात आला होता. तिथं सोरेंटिनो या इटालियन दिग्दर्शकाचा अप्रतिम सिनेमा ‘द ग्रँड ब्युटी’-‘ला ग्रांद बेलझ्झा’ बघायला मिळाला. सुबत्तेच्या ओझ्याखाली क्षीण होत जाणाऱ्या सर्जनशील आवाजाचा, सौंदर्याचा, निर्मितीक्षमतेच्या अभावाचा शोध आणि विश्लेषण सोरेंटिनोनं या चित्रपटाद्वारे केलं आहे.

अंतोनिओनि आणि फेलिनी या दोन दिग्गज दिग्दर्शकांच्या कलाकृतीसोबत ‘द ग्रँड ब्युटी’ची व्हिज्युअल भाषा संवाद साधते. कित्येक महत्त्वाच्या कलाकृतींमधल्या (ला डोल्शे विट्टा, ला नोट्टे) प्रसंगांची पताका स्थानं मिरवत ‘द ग्रँड ब्युटी’ हा सिनेमा उलगडतो. ‘एट अँड हाफ’ या फेलिनीच्या सिनेमाची सुरुवात अत्यंत प्रभावात्मक आणि प्रतिकात्मक घुसमटीनं होते. ‘द ग्रँड ब्युटी’ आपल्याला अतिश्रीमंत, अति सुबत्तेत दंग असलेल्या रोमन पार्टीलाइफमध्ये खेचतो. पूर्वसुरींच्या कलाकृती सोबत सोरेंटिनोची फिल्म अत्यंत इंटेन्स पद्धतीनं संवाद साधते आणि ती बघणाऱ्या डोळ्यांना अधिक खोलात उडी मारायचं आवाहन करते.

जेप गॅम्बार्डेला- रोममधला लेखक- हाय सोसायटी पत्रकार.. त्यानं पहिली कादंबरी लिहूनही चाळीस वर्षं उलटलीएत. जेपच्या पासष्टाव्या वाढदिवसाच्या प्रचंड, डिकेडन्ट पार्टीनं ‘द ग्रँड ब्युटी’ची सुरुवात होते.
सुंदर शरीरं, फॅशन्स, बेभान म्युझिक, मनोरंजनाचं उथळ अमेरिकन नव्हे, तर युरोपियन वातावरण. अमेरिकन पार्टी म्हणजे तरुण, सेक्स-ड्रिव्हन, उथळ आणि कॅलस समूह तर युरोपियन हाय सोसायटी पार्टी ही उत्तरमध्यमवयीन, तारुण्याच्या शोधात पण तारुण्यापलीकडे गेलेल्या परंपरागत श्रीमंतांची पार्टी. या पार्टीत बेभान होऊ इच्छिणारे एकएकटे जीव आणि पार्टी संपल्यावर पहिल्यांदा भानावर येणारी जेपची सौंदर्यविहीन एडिटर या अत्यंत वेगवान पार्टी प्रसंगातून सोरेंटिनोचा ‘सौंदर्यशोध’ सुरू होतो.

रोममध्ये दोन राजधान्या एकमेकांसोबत नांदतात. पहिली कॅथलिक चर्चमुळं जगभरच्या ख्रिश्चन धर्मियांच्या धर्मसत्तेचं केंद्र असलेलं रोम- दुसरीकडे मिलानसारख्या शहराजवळचं, डिझायनर फॅशनचं केंद्रस्थान. युरोपच्या धर्मसत्ता आणि श्रीमंत वर्गाची ‘कंझम्प्शन सत्ता’ रोममध्ये एकवटलीए- त्या शहरात, बाल्कनीतून सिटाडेल दिसतं अशा प्रचंड घरात जेप राहातो.

इथल्या जगण्यावर जेपनं मांड घातलीए- मात्र ते करताना जीवन त्याच्या बोटाच्या फटीतून निसटलंय. बाकी कुणाला नसलं तरी जेपला त्या जीवनाच्या, व्हायब्रंट अस्तित्वाच्या अभावाचं भान आहे.

रोममध्ये विविध नवश्रीमंतांचे थर येत आहेत.. आणि ही सुबत्तेची झुकझुक गाडी जागच्या जागीच फेऱ्या घालतीए.. ‘इथे आले, इथून पुढे कुठं?’ हा प्रश्नच त्यांना सोडवता येत नाहीए.. या साडेतीन फूट खोल स्विमिंगपूलमध्ये सगळेच तरंगतायत पण खोल सूर कोणालाच मारता येत नाहीए..या जीवनाची संगती लावत, काहीसा अलिप्त, पासष्टाव्या वाढदिवशी थोडा अस्वस्थ झालेला तीव्र बुद्धिमान जेप ‘ग्रँड ब्युटी’चा शोध घेतो.

रोममधल्या विविध ऐतिहासिक सौंदर्यपूर्ण वास्तू, चित्रकलेच्या क्षेत्रातले (उथळ) प्रयोग, हाय फॅशन, त्यासोबत येणारं हाय लाईफ- सोरेंटिनो या सुखानं भरलेल्या आयुष्यातल्या निर्मितीच्या अभावाचा कंद सोलतो. (लहान मुलीला खेळू न देता तिला चित्रात प्रयोग करायला लावणारा कलात्मक पेडोफेलिया इथंच भेटतो.)

या अति श्रीमंतीचं व्याकरण जेपनं आत्मसात केलंय. फ्यूनरलचं व्याकरण तो गणितमानी पायऱ्या-पायऱ्यांनी डिकोड करून मैत्रिणीला सांगू शकतो. फ्यूनरल कळणाऱ्या जेपला- मैत्रिणीच्या मृत्यूनंतर ‘मृत्यू’ समजतो.
प्रेम, सेक्स, सौंदर्य, त्यामध्ये दंग होणं- सारं काही जेपच्या आयुष्यात आहे. मात्र सुबत्तेत सौंदर्याचं अवतरण होत नाही. मनावरची भुतं एकेकाळी यशस्वीपणे उतरवणारा कार्डिनल बेलुचीदेखील जेपच्या मनावरचं हे साचलेपणाचं भूत दूर करू शकत नाही. मात्र ‘पराकाष्ठा’ म्हणजे काय? ते समजलेली संतत्त्वाच्या पायऱ्या चढणारी नन- जेपला सौंदर्यरहस्याचा दरवाजा किलकिला करून दाखवते.

जेपच्या बाल्कनीत या ननच्या एका हळुवार हाकेनं जेव्हा सारस पक्षी अवतरतात आणि तिच्या हळुवार फुंकरीनं ते उडून जातात या चमत्कार दर्शनानं ‘द ग्रँड ब्युटी’चं सहजत्व आणि त्यातली जगणं जाणण्याची किमया जेपला क्षणकाल दिसून जाते.

या साऱ्या व्यक्तींचा ग्रँड परफॉर्मन्स ज्या स्टेजवर चालू आहे- त्या मोकळ्या जागेचं नाव आहे रोम. युगायुगांच्या सांस्कृतिक इतिहासाचे थर या शहरावर आहेत... ‘रोमानियत’- या रोमची घडी जेपला उलगडलीए- तसंच इथला घुसमटता, वांझ एकटेपणा, प्रेमाचा अभावही त्याला समजलाय.

युरोपच्या अति वैभवात दंग झालेली पार्टी जेपला बेचव वाटते. पण जे पार्टीत आहेत त्यांना पश्चात्तापाचा स्पर्शही झालेला नाही. या साऱ्या कंझप्शनग्रस्त जगाला अधोविश्वातून टेकू देणारा डॉन जेपचा शेजारी आहे आणि तो आपला शेजारी आहे हे त्याला अटक होईस्तोवर जेपला कळत नाही- हे सोरेंटिनोचं दिग्दर्शक म्हणून जाणवणारं रचनेचं कौशल्य आहे.

अस्तित्ववादाच्या पकडीतून सुटत एका पोस्टमॉडर्न चमत्काराला सोरेटिनोच्या ‘द ग्रँड ब्युटी’ कवेत घेतो. जेप गँबार्डेलामार्फत, १४२ मिनिटांत युरपच्या, डिकेडन्ट, दुखऱ्या, रिकाम्या ह-दयावर सोरेंटिनो कॅमेरा रोखतो आणि पार्टीनंतरच्या पहाटे- एक चमत्काराची शक्यता जेपच्या मनात जागी करतो.न लिहित्या लेखकाला, त्याच्या न लिहिण्यात केंद्रस्थानी ठेवणारी ही कलाकृती- आणि अति वैभवानं संवेदनाशून्य झालेलं रोम हे त्या लेखकाच्या मनाचं नेपथ्य- या जागेत ‘द ग्रँड ब्युटी’ आकाराला येते- आणि आयुष्य उलगडणाऱ्या डोळ्यांना खिळवून ठेवते.